मुंबई – सन 2020-2021 च्या खरीप हंगामातील धान, भरड धान्य खरेदीमध्ये जर गैरव्यवहार झाले असतील तर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पणन हंगाम 2020-2021 मधील धान व भरडधान्य खरेदीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
संबंधित जिल्ह्यांमध्ये होणारी धान खरेदी केंद्र शासनाच्या विहित निकषांनुसार होत आहे. याबाबतची खात्री जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी. तसेच धान खरेदीनंतर प्राप्त होणारा तांदूळ साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता सुनिश्चित करावी. हा तांदूळ लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी.
नाशिक जिल्ह्यातील धान खरेदी केली जाते मात्र तिथे मिलींग होत नाही याची दखल घ्यावी. पालघर, ठाणे, गडचिरोलीसाठी बेस गोडाऊनचा निर्णय घ्यावा. नवीन धानाच्या भरडाईचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करावे, तसेच गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सक्षम करा.
तांदुळाची गुणवत्ता तपासणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घ्यावी. सचिवांच्या नियंत्रणाखाली फ्लाईंग स्क्वॉड तयार करून मिलर्स व गोदामांची तपासणी करावी, असे निर्देशही भुजबळ यांनी दिले.