मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 117 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये ‘काँटे की टक्कर’ असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
सुरुवातीचे जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. यावरून कर्नाटकात कॉँग्रेस मुसंडी मारत असल्याचे दिसते. हे पाहता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “कर्नाटकाचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षासाठी सत्तेचा दरवाजा उघडणार असेल. ही लोकांची भावना आहे. कर्नाटक निकाल हा लोकांची मन की बात आहे. ती लोकं प्रचाराला बळी पडले नाही. पंतप्रधान मोदींचं आणि अमित शहांचं कोणीही ऐकलं नाही. कर्नाटकात भाजपच्या नेत्यांनी तंबू ठोकला होता. पण मोदी आणि शहा यांना लोकांनी झिडकारलं. अनेक राज्यातून ज्या टोळ्या आल्या आहेत. महाराष्ट्रातून काही लोक गेले होते, जिथे जिथे गेले तिथे पराभव झाला होता. महाराष्ट्रातून एक टोळीही गेली होती. पण लोकांनी साफ नाकारलं आहे. ”
यावेळी संजय राऊत यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरूनही भाजपवर निशाणा साधला. द केरळ स्टोरी या चित्रपटावरूनही प्रचंड राजकारण झालं. कर्नाटकमध्ये कोणतीही स्टोरी चालली नाही, फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. बजरंग बली हा श्रीरामांचा भक्त होता, पण तो जनतेच्या आणि सत्याच्या बाजूने गेला असल्याचेही संजय राऊत म्हणाले.