एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलै नंतरच होणार असलायच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार हा सस्पेन्स कायम असताना आमदार बच्चू कडून आपल्या मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. आपल्याला सामाजिक न्याय खातं, त्यातून अपंग कल्याण मंत्रालय वेगळं काढावं आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा बच्चू कडूंनी बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.
माझी इच्छा आहे की सामाजिक न्याय या खात्यात एकतर अपंग कल्याण खातं वेगळं काढावं आणि ते ही पद आम्हाला मिळावं. ज्यातून जो दुर्लक्षित घटक आहे, त्यांची सेवा करण्याची काम जरी आम्हाला दिलं तरी आम्ही धन्यता मानू.सोबतच कार्यकर्त्यांची आणि सगळ्यांची मागणी होती की अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे असं देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.
जे मिळेल त्यात समाधानी असू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. या सरकारमध्ये त्यांनी अधिकच्या गोष्टींची इच्छा वर्तवल्याने हे सरकार त्यांची इच्छा पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.