मुंबई – राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने सोमवारी अधिकृतपणे आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीत आता काहीशी उसंत किंवा स्थिरता यायला हरकत नाही. राज्याच्या राजकारणात एकामागून एक पद्धतीने सुरू असलेली ही धक्क्यांची मालिका आता जरा स्थिरस्थावर होताना दिसते आहे. अशातच राजकीय वर्तुळात नेमकी शिवसेना कोणाची असा प्रश्न रंगू लागला आहे. यावरून सध्या शिंदे सेना तसेच शिवसैनिकांमध्ये आरोप प्रत्यारोपही केले जात आहे.
खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असे आरोप करतांना बंडखोर आमदार आणि शिवसैनिक दिसत आहे. यातच गुलाबराव पाटील यांनी याच मुद्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’आम्ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला आणि तो यशस्वी झाला आहे. शिवसेनेचे जळणारे घर वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल.’ असा दावा पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले,’शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.