पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1970 साली जयवंत दळवी यांनी लिहिलेली “महानंदा’ ही कादंबरी कमालीची गाजली आणि आजही ती रसिकप्रिय आहे. महानंदावर सिनेमाही निघाला आणि नाटकही आले. एका असफल प्रेमाची अस्सल प्रेमकथा म्हणून महानंदाकडे बघावे लागेल. अर्थात असे असले तरी या कादंबरीची पार्श्वभूमी वा पदर अगदी वेगळा असल्याने ही कादंबरी अजूनच ठसठशीतपणे समोर येते. ही पार्श्वभूमी कोकणात असणाऱ्या भाविणीच्या प्रथेची आहे. भाविणींची लग्न होत नाही. पुरुषांची इच्छा भागवायची आणि त्यांच्या आश्रयाने चरितार्थ चालवायचा, असा या महिलांच्या नशिबी आलेला भोग. भाविणींना कोकणातल्या देवांना सोडलेले असते.
कादंबरीचा नायक बाबूलनाथच कादंबरी सांगतो आणि त्यातून घटनाक्रम उलगडत जातो. पहिल्याच प्रसंगात बाबूल बोटीने प्रवास करुन कुठल्याशा बंदरावर पोहचतो. बाबूल मामाच्या गावी जाण्यासाठी तेथे आला आहे. अर्थात मामाचे गाव बंदरापासून आठ मैल दूर त्यामुळे बंदरावर घ्यायला मामा येतील असे त्याला वाटत असते पण मामांचा कडक स्वभाव बघता तशी शक्यता दुरापास्तच होती. बाबूल बंदरावर उतरतो आणि मामाचा नोकर लखोबा “धनी’, “धनी’ अशी हाक मारत त्याच्यापाशी येतो. लखोबा मामांकडे अनेक वर्षांपासून काम करीत आहे.
गाडी गावाजवळ आल्यावर रवळनाथाच्या मंदिराचे घुमट नजरेस पडताच बाबूलचे हात आपोआप जोडले जातात. गाडी घराच्या अंगणात पोहचते, तेव्हा मामा लाकडं फोडत असतो. मामांकडे शेती-वाडी-जमीनजुमला चांगला पण मूलबाळ नाही स्वभावात एक प्रकारचा तऱ्हेवाईकपणा. बाबूलच्या येण्याचा आनंद नाही आणि जाण्याचे दु:ख नाही. बाबूल हातपाय धुवून घरात शिरतो तेव्हा मामी चुलीतली लाकडे फुंकणीने फुंकत असते. बाबूल एम.ए. झालेला आणि सध्या मुंबईच्या कॉलेजात नोकरी करतोय.
संध्याकाळी बाबूल पाय मोकळे करायला रवळनाथाच्या देवळापर्यंत जातो. आजूबाजूला गच्च अंधार. देवळात पहिल्यांदा त्याची एका उतारवायच्या महिलेशी भेट होते. ही महिला म्हणजे देवाची भावीण कल्याणी. कल्याणी बाबूलची चौकशी करते. बाबूलच्या आईशी तिचे मैत्रीचे संबंध असल्याचाही उल्लेख करते आणि मंदिराजवळ असणाऱ्या घरी जाऊन तबकात विडा घेऊन येते. बाबूलच्या समोर विडा धरल्यावर ती विड्याची परंपरा सांगते. तबकात अधेली टाकून झाल्यावर कल्याणी घरी जाईल असे बाबूलला वाटते पण ती जुन्या हकिगती सांगत राहते. आईच्या लग्नाच्या वेळी मीच पाठराखीण होते, असे तिने सांगितल्यावर तिची जवळीक अजूनच त्याला जाणवू लागते. घरी जाताना कल्याणी बाबूलला तिचे घर दाखविते. घराच्या अंगणात जुईच्या मंडपात जुईची फुले खुडणारी एक तरुण मुलगी असते. कल्याणी तिला हाक मारते, “गो मानू’. मानू म्हणजेच महानंदा! मानू पुढे येते. कल्याणी बाबूलची ओळख करुन देते. पण त्यावेळी मानू नीट दिसत नाही. पण त्याचवेळी मानूविषयी एक अनामिक आकर्षण मात्र त्याच्या मनात निर्माण होते. मामा-मामीमध्ये तितकासा संवाद नाही. समन्वय नाही. रात्री ओट्यावर मामा आणि बाबूल झोपतात. रात्री उशिरा मामा कुठेतरी गेल्याचे बाबूलला जाणवते. त्याचवेळी मामी घरातून येऊन बघून गेल्याचे व मामा बिछान्यावर नसल्याने मामीला हुंदका फुटल्याचेही बाबूलला जाणवते.
दुसऱ्या दिवशी मामा घरात नसताना मामी बाबुलकडे कल्याणीची चौकशी करते आणि कल्याणी मामाबद्दल काही काही बोलली होती का हेही विचारते. रात्री बाबूल मुद्दाम देवळात जातो आणि तेथून कल्याणीच्या घरी. कल्याणी त्याला घरात बोलवते. आत मानू असते. कल्याणी मानूला तेथेच थांबायला सांगते आणि तिला मराठी पुस्तके वाचण्याचा छंद आहे, हे तिच्या संभाषणातून कळते. तोच धागा पकडून बाबूल स्वत:जवळील पुस्तके उद्या आणून देण्याचे सांगून उठतो. निघताना कल्याणी त्याला जुईचा गजरा देते. तसाच गजरा त्याला मामांच्या कोटाच्या खिशातही सापडतो. मामाच्या घरी आलेली नारळाची गोणही त्याला कल्याणीच्या घरी दिसते. या साऱ्या प्रकाराने मामांचे कल्याणीसोबत काही वेगळे संबंध असावेत अशी त्याला खात्री पटू लागते.
दुसऱ्या दिवशी तो त्याच्या ट्रंकेमधून काही पुस्तके काढून बाहेर पडण्याचे ठरवतो पण मामी त्याला जाऊ देत नाही. संध्याकाळी तो शिताफीने लखोबाच्या हाती ती पुस्तके पुढे पाठवतो आणि नंतर स्वत: जातो. मानू आतल्या खोलीत असते. तो आत शिरतो. त्याला पाहताच ती लाजते. तो कादंबऱ्या देतो, तेव्हा तिला खूप आनंद होतो. थोड्यावेळाने ती तोरण विणू लागते. ते त्याला आवडल्याचं तो सांगतो, म्हणून मग मुंबईला जाताना ते सोबत घेऊन जा असे ती सांगते, पण तोरणासोबत तुही मुंबईला चल असे तो हिंमत करुन म्हणतो. ते ऐकल्यावर ती गप्प होते आणि “एका भाविणीच्या मुलीला कशाला आशा लावता’ असं वाक्य म्हणते. त्याला ते आवडत नाही. “जन्माने येणारे मोठेपण आणि कमीपणा मी मानत नाही’ असे तो म्हणतो. मग त्यांच्यातील संवाद हळूवारपणे खुलत जातो. ती दिसायला सुरेख, बांधेसुद असते. गोरीपान, देवाधर्माचं करणारी, गोड आवाजात गुणगुणणारी, अदबशीर वागणारी आणि तो मुंबईच्या कॉलेजात प्राध्यापक असणारा. तिच्याशी लग्न करावे हा त्याचा विचार एव्हाना निश्चित झालेला. जाताना ती त्याला “जत्रा करुनच जा’ एवढे सांगायला विसरत नाही.
रात्री उशिरापर्यंत तो जागतो. मामा गाढ झोपतात पण तो मानूच्या विचाराने टक्क जागा असतो. एका क्षणी तो उठतो आणि मानूकडे गुपचूपत्या पावलांनी निघतो. मध्यरात्रीची वेळ असते. तो मानूकडे पोहचतो तेव्हा मानू वाचत असते. ती गडबडून उठते आणि “तुम्ही याल असं वाटतच होतं’ असं सांगते. एकमेकांच्या मिठीत काही क्षण विसावल्यावर ती त्याला घरी परतायला सांगते. संध्याकाळी मानूच्या ओढीने तो परत मानूकडे येतो तेव्हा मानू त्याची वाटच बघत असते. “तुला मुंबईला नेणार’ हे त्याचे पालूपद सुरू असते आणि “देवाचे पाय सोडून भावीण गेली तर कधीच कल्याण होणार नाही’ हे तिच्या आईने कल्याणीने सांगितलेले म्हणणे ती सांगत राहते. दरम्यान दिवाळी येते पण दिवाळीचा उत्साह आणि आनंद जाणवतच नाही. संध्याकाळी पणत्या आणि आकाशकंदील लावून झाल्यावर तो मानूकडे जातो तेव्हा मानू सुंदरसं पातळ नेसून उभे असते. ती त्याला आत नेते आणि सजवलेल्या पाटावर बसवून ओवाळते. तिला ओवाळणी म्हणून तो सदऱ्याला असलेली सोन्याची बटनं ताटात टाकतो. मानू आणि त्याच्यातले प्रेम आता घट्ट झालेले असते. वेळ पाहून बाबूलच कल्याणीला मानूविषयी सांगतो. “तिला मुंबईला घेऊन जातो आणि तिच्याशी लग्न करतो’ हे त्याचे वाक्य ऐकल्यावर तिला धक्का बसतो. भाविणीच्या पोरीला लगीन करता येणार नाही, असं ती सांगते. अजून बरंच काही सांगते. शेवटी म्हणते, “तू जातीतली मुलगी कर. तुझी इच्छा असली तर वर्षातून दोन वेळेस येत जा, तू तिला साडीचोळी कर, ती तुझीच राहील!’
तो नकार ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि तो मामाकडे परततो. दोन दिवसांनी जत्रा येते. त्यावेळी तो देवाचा कौल घेतो पण कौल त्याच्या विरुद्ध जातो. रात्री जत्रेला तुफान गर्दी होते. मध्यरात्री देवाची पालखी निघणार असते. बाबूल त्या गर्दीत फिरत असतो, तेवढ्यात त्याला सुंदर सजलेली मानू आणि बाकीच्या भाविणी दिसतात. काही वेळाने ती त्याच्या अंगावरुन पुढे जाते आणि जाताना डोळ्यांनीच पाठोपाठ येण्याविषयी खुणावते. देवळाच्या परिसरातून बाहेर पडल्यावर तिच्या मागोमाग तो अंधारातून जात राहतो. ती बरोबर मागच्या दाराकडून त्याला घरी आणते. घरी कोणीच नसते. त्या रात्री त्यांचे मिलन होते. दुसऱ्या दिवशी तो मुंबईला निघतो. घरी काय कॉलेजात काय, त्याला मानूच डोळ्यासमोर दिसते. मानूशी लग्न करायच्या इच्छेने तो पछाडलेला असतो. मुंबईहून तो नागपूरला बदली करुन घेण्याच्या खटपटीत लागतो. तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे असे आईच्या लक्षात येते. पण तो सांगत नाही. नागपूरचे जाणे निश्चित होते, तसे तो पुन्हा एकदा मामाकडे जायचे ठरवतो.
बंदरावर येतो, तेथून गावाकडे जाण्यासाठी बैलगाडीत बसतो आणि देवळापाशी येतो. मी येतोय असे पत्र त्याने मानूला धाडलेले असते. मानू आपली वाट पाहत असेल अशी त्याची खात्री असते. तो कल्याणीच्या घरी पोहचतो तेव्हा मानू तिच्या मावसबहिणीच्या घरी गेली आहे असे त्याला समजते. तिला दिवस गेले आहेत आणि पाचवा महिना आहे असे कल्याणी त्याला सांगते. हा त्याच्यासाठी धक्का असतो कारण ते मूल त्याचे नसते. मामाकडे तो कसाबसा पोहचतो आणि दुसऱ्याच दिवशी घरी निघतो. तत्पूर्वी देवळात जातो तेथे कल्याणी येते. ती त्याची समजूत काढते. भाविणीच्या पोरीला लग्न करता येत नाही, हे पुन्हा एकदा सांगते. त्यानंतर मुंबईला येऊन अगदी नैराश्याने बाबूल नागपूरला जातो. जणू जीवनरस संपून गेल्यासारखे त्याचे आयुष्य होते. तो लग्न करीत नाही. अठरा वर्षांत सहा कॉलेज बदलतो. अकाली केस पांढरे होतात. दात पडतात. आईला कुठूनतरी कळते, तेव्हा ती स्वत: मानूशी लग्न कर म्हणून सांगते. पण बाबूल ऐकत नाही. वयाची चाळीशी उलटते. एक दिवस मामा हृदयविकाराने गेल्याचा निरोप येतो. तब्बल वीस वर्षांनी तो मामाच्या गावी येतो. गाव बदललेले असते. बैलगाड्या बंद होऊन सर्व्हिस गाड्या सुरू झालेल्या असतात. घरी पोहचतो तेव्हा मामी चटईवर पडून रडत असते. संध्याकाळी मामी बाबूलला, तुला मानूसोबत लग्न करावयाचे होते का? असे विचारते तेव्हा बाबूल “नाही’ सांगतो.
रात्री लखोबाकडून त्याला धक्का देणारी बातमी समजते, ती म्हणजे मानू मामांचीच मुलगी असते आणि मानूला एक मुलगी आहे, ती अगदी तुमच्यासारखी दिसते असे तो पुढे सांगतो. दुसऱ्या दिवशी देवळात गेल्यावर एक अठरा-वीस वर्षांची सुरेख मुलगी त्याला बोलवायला येते. ही मुलगी महानंदाची असते. दमयंती तिचे नाव. बाबूल गेल्याबरोबर महानंदा रडू लागते. सगळं काही संपलेले असते. मानूला त्यावेळी खोटे सांगून कल्याणी परगावी पाठवते. बाबूलचे पत्र दाखवत नाही आणि बाबूलला महानंदेला होणारे मूल तुझे नाही असे सगळी बनवाबनवी करते. त्यामुळे महानंदा आणि बाबूल दुरावतात आणि आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करून घेतात. महानंदा आईला, मामांना आणि त्याच्या घरी येणाऱ्या पोस्टमास्तरला शिव्या देते. आईला तिने कोंडून घेतलेले असते.
रात्री मामी त्याला मानूशी त्यावेळीच लग्न करुन घ्यायला हवे होते असे सांगते. दुसऱ्या दिवशी मानू दमयंतीला सोबत घेऊन जायला सांगते आणि मग बाबूलसोबत त्याची मुलगी त्याच्या घरी जावयास निघते, मानूला एकटीला गावी ठेवून. दमयंतीच्या सोबत दोन तीन डबे तिच्या पिशवीत असतात. एकात फराळ असतो आणि दुसऱ्यात मानूने वीस वर्षांपूर्वी संसारासाठी विणलेले तोरण असते.
एक असफल प्रेमकथा वाचकाच्या हृदयाला घर करते. मानू आणि बाबूलनाथ यांचे मिलन न झाल्याने निर्माण होणारी हुरहूर कित्येक दिवस टिकते.
पुस्तकातली माणसं
डॉ. विनोद गोरवाडकर