कोल्हापूर :- आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्षयमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर मध्ये महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भव: योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे राबवा.