नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर उद्या २२ जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या १० लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक ठिकाणी ‘राम ज्योती’ प्रज्वलित केली जाईल.
शरयू नदीच्या काठी मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर ‘राम ज्योती’ पेटवल्यानंतर सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण असेल.
प्रादेशिक पर्यटन अधिकारी (आरटीओ) आर. पी. यादव म्हणाले की, २२ जानेवारीला संध्याकाळी १०० प्रमुख मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी दीपप्रज्वलन केले जाणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी स्थानिक कुंभारांची मदत घेण्यात येत असून त्यांच्याकडून दिवे खरेदी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली. अभिषेक सोहळ्यानंतर योगी सरकारकडून संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजवली जाईल आणि त्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
रामलल्ला, कनक भवन, हनुमानगढी, गुप्तरघाट, सरयू बीच, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणीसह १०० मंदिरे, प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी दिवे लावले जातील.