राजेंद्र भुजबळ
शिर्डी, दि. 23 – लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईंच्या शिर्डीत साई संस्थानने 180 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत अशा दर्शनरांगेच्या इमारतीची निर्मिती केली आहे. मात्र, ही इमारत पूर्ण होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दर्शनरांगेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंतप्रधानांची तारीख मिळविण्यासाठी प्रयत्नात आहे. त्यापूर्वीच दि. 9 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिर्डीत साईसमाधी दर्शनासाठी येणार असल्याची अधिकृत माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे. जर पंतप्रधानांची तारीख मिळत नसेल, तर राष्ट्रपतींच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यास काय हरकत आहे, असा सवाल भाविक विचारत आहे.
शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय धार्मिक तीर्थस्थान आहे आणि देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या स्त्रीला उद्घाटनाचा हा मान दिला, तर देशात एक चांगला मॅसेज जाईल आणि राजकीय वर्तुळामध्ये एक आदर्श निर्माण होईल. मात्र, केवळ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा अट्टाहास हा कुठेतरी राजकीय वाटत असला, तरी भाविकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत.
साई संस्थानने प्रायोगिक तत्त्वावर दर्शनरांग सुरू केली, तर भाविकांच्या अडचणी व त्रुटी लक्षात येऊ शकतात. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून डामडौलात उभी असलेली दर्शनरांगेची इमारत इतक्या दिवस केवळ उद्घाटनाच्या नावाखाली पडून ठेवणे नक्कीच अशोभनीय आहे. याचा विचार प्रशासनाने केला तर भाविकांना नक्कीच त्रासातून मुक्ती मिळेल. कारण इमारतीमध्ये भाविकांसाठी चौदा लिफ्ट, चार प्रशस्त वातानुकूलित हॉल, मोफत चहा, पाणी, नास्ता, बुक स्टॉल, प्रसादाचे स्टॉल, हार, फुले व पूजेचे साहित्याचे स्टॉल, एक ओपीडी यांसह अनेक सुख-सुविधा भाविकांना मिळणार आहे. भाविकांच्या देणगीतून साई संस्थान कोट्यवधींची विकासकामे करत असून, त्यापैकी भाविकांच्या सुख-सुविधेसाठी व आनंदाने व समाधानाने प्रत्येकाचे दर्शन व्हावे याच उदात्त हेतूने या अद्ययावत दर्शनरांगेची निर्मिती केली आहे. मात्र, ती तयार होऊनही आज उदघाटनाच्या प्रतीक्षेत आणखी किती दिवस राहणार हाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिर्डीत येत असून, एका आदिवासी महिलेच्या हातून या वास्तूचे उद्घाटन झाल्यास देशाला ही अभिमानाची गोष्ट असेल, तर शिर्डीसारख्या तीर्थस्थानी मोठी अभिमानाची बाब असेल.
– श्रीमती रूपाली सचदेवा (साईभक्त), इंदौर