कोयनानगर (विजय लाड) – कोयना धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले हे धरण सर्वाधिक ‘गाळयुक्त’ झाले आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे धरणात प्रचंड गाळ साठला आहे. त्याचे सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असला, तरी या गाळाचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण लगेच भरत असल्याने, कोयना धरणात गाळ किती आणि पाणीसाठा किती, हे प्रश्न राज्यातील जनतेला सतावत आहेत. जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे राज्यातील जनतेचा “तेजाकडून तिमिराकडे’ असा उलटा प्रवास होणार आहे.
कोयना धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून, जून महिना संपत आला तरी मान्सूनने दडी मारली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो. या क्षेत्रात सहा हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर धरण पूर्ण भरते. पावसाळा अजून सुरू न झाल्याने धरणात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे धरणात किती प्रमाणात गाळ साठला आहे, ते आता दिसत आहे. दर दोन ते तीन वर्षांनी गाळाचे सर्वेक्षण होणे गरजेचे असताना आणि शासनाचा तसा आदेश असताना, धरणातील गाळाचे सर्वेक्षण होत नाही. पाच हजार मिलीमीटर पावसानेसुद्धा धरण “ओव्हरफ्लो’ होत आहे. कमी पर्जन्यमानात कोयना धरण लवकर भरणे, ही गाळाची किमया असून, जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने ही जलसंपदा हळूहळू “गाळसंपदा’ बनत आहे.
कोयना धरणात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. धरणातील गाळ खाली बसेपर्यंत जवळजवळ एक वर्ष पाण्याचा रंग लाल होता.आता धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने पाण्याचा रंग पुन्हा लाल झाला आहे. धरणात किती क्युबिक मीटर गाळ आहे, याबाबत कोयना धरण व्यवस्थापन अनभिज्ञ आहे. कोयना प्रकल्पाचा एक हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा गाळाने भरला आहे. या प्रकल्पाच्या अवतीभोवती 23 वर्षांमध्ये साचलेल्या गाळामुळे येथील यंत्रणेला गंज लागला आहे. गाळाने चारही बाजूने वेढलेल्या एक हजार मेगावॅट क्षमतेच्या चौथ्या टप्प्याचा श्वास गुदमरत आहे. सद्य स्थितीत पाऊस लांबला असताना, हा गाळ तात्काळ काढला नाही, तर भविष्यात वीजनिर्मितीचा हा टप्पा गाळामुळे धोकादायक होऊ शकतो.
त्यामुळे हा टप्पा तातडीने गाळमुक्त करा, असे पत्र महानिर्मिती कंपनीने जलसंपदा विभागाच्या कोयना प्रकल्प व्यवस्थापनाला दिले आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम यांत्रिकी विभाग व जलसंधारण विभागाने सुरू केले आहे. या कामाला महानिर्मिती कंपनीकडून निधी देण्यात आला आहे. धरणातील गाळाचे सर्वेक्षण न करता गाळ काढण्यात येत असल्याने कोयनेचे “पाणी कुठे तरी मुरत’ असल्याची शंका उपस्थित होत आहे.
वीजनिर्मितीला प्राधान्य द्यावे
कोयना जलविद्युत प्रकल्पातून 99 टक्के वीजनिर्मिती बंद असल्याने, त्याचा परिणाम राज्यात सगळीकडे जाणवत आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी कोयना प्रकल्प व्यवस्थापनाकडे केली जात आहे. सध्या राज्यात 600 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मितीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी “डिसकॉम’ आणि “ट्रान्सकॉम’ या कंपन्यांनी केली आहे.
धरणात 12 ते 14 क्युबिक मीटर गाळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता पाच ते सहा टक्क्यांनी कमी झाली आहे. गाळाचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येणार आहे.
– एच. व्ही. गुणाले,मुख्य अभियंता, कोयना प्रकल्प.