शिर्डी, दि. 25 (प्रतिनिधी)– साईबाबा संस्थान प्रशासनाने कंत्राटी ठेकेदारीच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा घातलेला घाट कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून संस्थानने इनसोर्सद्वारेच कर्मचाऱ्यांना काम उपलब्ध करून द्यावे, अन्यथा साई संस्थान प्रशासनाला शिर्डी ग्रामस्थ काम करू देणार नसल्याचा इशारा शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिला.
देश विदेशातून शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी साई संस्थानकडून ठेकेदारी पध्दतीने मनुष्यबळ घेतले जात आहे. हजारो कर्मचारी भविष्यात संस्थान सेवेत कायम होवू,या आशेने काम करीत असताना साई संस्थानने यापुढे मनुष्यबळ ठेकेदारी पध्दतीनेच घेण्याचा डाव आखला आहे.नव्या ठेकेदारी पध्दतीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा अधिकारी व ठेकेदार करून घेणार आहेत. या अन्यायकारक प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. नव्या ठेकेदारी पध्दतीमुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. साई संस्थानच्या या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थ प्रखर विरोध करून नवीन ठेकेदारी पध्दत यशस्वी होवू देणार नाही. याबाबत साई संस्थान प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलनही उभारू, असा इशाराही त्यांनी दिला.
वर्षानुवर्षे कंत्राटी काम करणाऱ्या साई संस्थानमधील 1052 कर्मचाऱ्यांना साईसंस्थानच्या सेवेत कायम करण्याचा धाडसी निर्णय यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण झाले आहे. सध्या काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी व त्यांना संस्थान सेवेत घेण्यासाठी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र काही लोक या गरीब कंत्राटी कामगारांच्या प्रश्नातही राजकारण करून संबंध नसतानाही श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
मंत्री विखे पाटील यांनी संस्थानमधील कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न अंतिम टप्यात आला असताना साई संस्थान प्रशासनाने नवीन ठेकेदारी पध्दत सुरू करण्याचा घातलेला घाट दुदैवी व अन्यायकारक आहे. यामागे मोठे अर्थकरण दडलेले असल्याने आणि परिसरातील हजारो कंत्राटी कामगारांवर अन्यायकारक असल्याने या नवीन ठेकेदारी पध्दतीबाबत साईसंस्थानने फेरविचार करावा, अन्यथा शिर्डी ग्रामस्थ संस्थान प्रशासन व कारभाऱ्या विरोधात तीव्र आंदोलन करून संस्थान प्रशासनाला काम करणे अवघड होईल, असा इशारा यावेळी कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके यांनी दिला.
कोट
साईसंस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम देताना साई संस्थानने ठेकेदारी पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच कुठल्याही प्रकारे ठेकेदारी पद्धत लागू करू नका, अशा सूचना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांना केली. शिवशंकर यांनी सुचना मान्य केल्याने इतरांनी यामध्ये राजकारण न करता कर्मचाऱ्यांची दिशाभूल करू नये व अफवा पसरू नये, तसेच कर्मचाऱ्यांनी अफवेला बळी पडू नये.