कोल्हापूर – औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. यादरम्यान नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आजही कोल्हापुरातील काही भागात बंद पाळला जात आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी मुस्लिम समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच मनामध्ये आकस राहिलेला नाही. गोविंद पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकात लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख मुस्लिम असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील? या मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही.”
“फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतात राहिलो आणि भारताच्या मातीमध्ये आपली नाळ घट्ट झाली आहे. भारतीयांचा आणि भारतामध्ये राहणाऱ्या समाजाचा जी भक्ती असेल ती आपली भक्ती असली पाहिजे. मुस्लिम धर्मीयांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे”, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.