महाराष्ट्राला संतापासून ते विचारवंतापर्यंतची एक मोठी परंपरा लाभलेली आहे.अवघ्या विश्वाच्या सुखाची प्रार्थना पसायदानातून करणारे संत ज्ञानेश्वर,भारुडाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला चढविणारे संत एकनाथ, रंजल्या गांजल्याचे हित जपणारे संत तुकाराम, दगडात देव नाही तर माणसात देव शोधणारे गाडगेबाबा अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी. तसेच छ. शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, गोखले टिळक, आगरकर, सावरकर यांच्या नावाने ओळखल्या जाणारा हा महाराष्ट्र.
देशाच्या इतिहासाची पाने कायम महाराष्ट्रासाठी राखून ठेवावी लागतात कारण महाराष्ट्राला फार मोठा जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे, महाराष्ट्राच्या नावातच ‘महा’राष्ट्र म्हणजेच मोठे राष्ट्र असा उल्लेख आहे. कवितेच्या माध्यमातून मोजक्या शब्दांत महाराष्ट्राची ओळख करून देतांना कविवर्य गोविंदाग्रज अतिशय समर्पक भाष्य करतात,
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।।
देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असेल तर वर्तमान महाराष्ट्रावर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल असे सांगतो की, कृषी आणि उद्योग या दोन्ही आघाड्यावर महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, यामुळे दोनही क्षेत्रातील वाढीच्या दरात घट झाली आहे. दरडोई उत्पन्नात कर्नाटक, तेलंगणा यांच्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील सर्वात जास्त म्हणजे 55 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासावर अधिकाधिक भर देणे गरजेचे आहे. जगाचा पोशिंदा म्हणवणारा बळीराजा वर्षानुवर्षे अस्मानी-सुलतानी संकटात सापडत असल्यामुळे तो मरणाला जवळ करतो. फक्त कर्जमाफी देणे हा आत्महत्यावरील पर्याय असू शकत नाही, त्यामुळे योग्य योजना आखून शेतकऱ्यांचे खांदे बळकट कसे होतील यासाठी प्रयत्न करावे लागतील, छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात राबवलेलं कृषि धोरण म्हणजे ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये’ असं कल्याणकारी धोरण आपल्याला राबवावे लागेल.
डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे शेती हा पोटापाण्याचा धंदा नाही तर तो राष्ट्रीय व्यवसाय आहे, ते राष्ट्रीय उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्राचे समाज-आर्थिक निर्देशक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या बाबीवर भर द्यावा लागेल, महात्मा गांधी ज्याला अंत्योदय म्हणतात, त्या समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा नवा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम शेवटच्या माणसावर कसा होतो याचा विचार करावा लागणार आहे, म्हणून महाराष्ट्राची दिशा या माणसाला डोळ्यासमोर ठेऊन आखावी लागणार आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे, नापिकीमुळे गावाकडून स्थलांतरिताचे लोंढेच्या-लोंढे शहराकडे वाहत आहेत, यामुळे मुंबई, पुणे,औरंगाबाद, नाशिक असे महत्वाची शहरे माणसांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली आहेत. अनेक गावांत ज्योतिषी नाही तर पाण्याची टँकर लग्नाचा मुहूर्त ठरवत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाला उद्देशून समर्पक लिहितात,
गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरून देशाची परीक्षा।
गावची भंगता अवदशा। येईल देशा।।
म्हणून ग्रामीण विकासावर अधिक भर देणे गरजेचे आहे. रोजगाराच्या शोधात शहराकडे निघालेले मानवी जथ्ये गावातच रोखण्यासाठी त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील खेडी समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी हजारो पोपटराव पवार आणि हजारो भास्करराव पेरे कसे निर्माण होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आता साठ वर्षे पूर्ण होत आहेत तरीही अनेक वाड्यावस्त्यांवर शासनाची वीज, रस्ते,शाळा आणि आरोग्याच्या सोयीसुविधा जेवढ्या पोहचायला पाहिजे होत्या तेवढ्या प्रमाणात पोहचल्या नाही. अठराव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर आयोगापुढे सर्वांना समान शिक्षणाच्या हक्काची मागणी केली होती आणि तोच कायदा तयार करायला आपल्याला 2009 साल उजाडावे लागले.
या कायद्याने वंचितांच्या मुलांना 25 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येऊ लागल्या पण त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात करण्यात येते हे ही बघणे गरजेचे आहे. मोठ-मोठ्या शाळात गरीबाच्या मुलाला शिक्षणाची दारी उघडी होतात का? गरीब आणि श्रीमंतातील दरी कमी करायची असेल तर शिक्षणाच्या वाटेवर एकीची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना उतरती कळा का लागली आहे? शाळा का बंद कराव्या लागत आहे याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
कधीकाळी विद्यापीठे रोजगाराची केंद्रे होती; आज ती बेरोजगारांची केंद्रे बनली आहेत,आपण ज्या शाखेचे शिक्षण घेत आहोत ती शाखा आपल्याला रोजगाराची दारे उघडी करून देईलच याची खात्री कुणालाही राहिलेली नाही. त्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्यामुळे अनेक मुलं-मुली स्पर्धा परिक्षेकडे वळत आहेत. यशस्वी होईलच याची तिळमात्रही खात्री नसतांनाही जोखीम उचलत आहेत. त्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांत शेतकऱ्यांच्या मुलांचा भरणा अधिक आहे. बापाच्या वाट्याला आलेलं दुःख मुलाच्या वाट्याला येऊ नये यासाठी शासनाने रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सद्या महिला सुरक्षा कळीचा मुद्दा बनला आहे. समाजात कुठेच महिला सुरक्षित नाही का?असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. सध्या मुलींच्या जळीत हत्याकांडाचे प्रकरणे समोर येत आहेत, गुन्हेगारांना कायद्याची भीती अशी वाटायला हवी अशी शिक्षा करणे गरजेचे आहे
. त्यामुळे कोणतीही स्त्री समाजात वावरत असताना ती आपली माता-बहिणच म्हणून दिसली पाहिजे. यासाठी सरकारने स्त्री सुरक्षेवर अधिक लक्षकेंद्रित करणे गरजेचे आहे. नव्या महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल असता कामा नये, पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक वाद पेटता कामा नये, विदर्भ- मराठवाड्यातील कोणत्याही व्यक्तीला आपण विकासापासून वंचित आहोत असं वाटायला नको, त्यामुळे या प्रदेशाच्या समोर लागेलेलं मागासलेपण दूर करून सर्व प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक समतोल कसा साध्य करता येईल यासाठी शासनाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
स्वराज्य असावं आणि ते रयतेचं सुराज्य असावं असं राज्य निर्माण करणारे छ. शिवाजी महाराज, शेवटच्या माणसापर्यंत पोहचलं पाहिजे असं सांगणारे म. गांधी, रक्ताचा एकही थेंब सांडू न देता इथल्या मातीत लोकशाही रुजविण्याची भाषा करणारे डॉ. आंबेडकर, निर्मिकाची कास धरत पुढे जाणारे महात्मा फुले, चिखल-शेण अंगावर झेलत माता भगिनींना शाळेच्या वाटेवर आणणाऱ्या सावित्रीबाई फुले. या परंपरेचा महाराष्ट्र पुढे नेणं आणि तो अधिकाधिक आधुनिक बनवणं, धर्मनिरपेक्ष बनवणं, विज्ञाननिष्ठ बनवणं,जात-धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असायला हवे. महाराष्ट्र बलशाली झाल्याशिवाय देश बलशाली होऊ शकत नाही. त्यासाठी कल्याणकारीराज्यव्यवस्थेची पायाभरणी करावी लागेल,तेव्हाच आपण नव्या महाराष्ट्राला म्हणू शकू.
कल्याणकारी राजसंस्थेचा रचिला पाया ।
महाराष्ट्र झालासे देशाचा कळस ।।
विष्णू जगन्नाथ नाझरकर