मेढा – ऐन पीक काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीके वाया गेली आहेत. पावसामुळे अजूनही जमिनींना वाफसा नसल्याने रब्बी हंगाम घेण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच लवकारत लवकर भरपाई न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
परतीच्या पावसामुळे जावळी तालुक्यात झालेल्या पिक नुकसानीचे पाहणी करण्यासाठी तालुक्यातील रिटकवली व बिभवी गावांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची गाऱ्हांनी ऐकून प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार, बागायती शेतीसाठी 50 हजार व फळबाग लागवडीसाठी एक लाख रूपये द्यावे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला जास्तीत जास्त भरपाईचा भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असेही आश्वासन दिले.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिश बुध्दे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंदकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सरपंच रिटकवली सचिन दळवी, बिभवी सरपंच जयश्री जाधव, सहायक पोलीस निरीक्षक निलकंठ राठोड, कृषीचे तंत्र आर. आर. देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, प्रकाश सुतार, तालुका सचिव बजरंग चौधरी आदी उपस्थित होते.