महापालिकेत बैठक : पहिल्या टप्प्यात वाल्हेकरवाडी, थेरगावमध्ये अंमलबजावणी
पिंपरी – महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नगररचना योजनेला (टीपी स्कीम) थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथून विरोध नसल्याने पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. वाल्हेकरवाडी येथील नागरिकांची याबाबत आज महापालिका भवनात बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक रा.म.पवार यांनी नागरिकांना “टीपी स्कीम’चे फायदे समजावून सांगितले.
नागरिकांनी टीपी स्कीमबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले. महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात सहा गावांसाठी टीपी स्कीम राबविण्याचे नियोजन ठरले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुनावळे, वाल्हेकरवाडी, रावेत, चिखली, बोऱ्हाडेवाडी, थेरगाव आदी गावांचा समावेश होता. चिखली, बोऱ्हाडेवाडी भागात टीपी स्कीम राबविण्यास नागरिकांचा विरोध वाढला. तसेच, रावेत, पुनावळे आदी गावांनाही वगळण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार महापालिका सर्वसाधारण उपसूचनेद्वारे पुनावळे, रावेत, चिखली, बोऱ्हाडेवाडी आदी गावे वगळण्यात आली. दरम्यान, थेरगाव आणि वाल्हेकरवाडी या दोन गावांमध्ये हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने टीपी स्कीम राबविल्याने नागरिकांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रातून “टीपी स्कीम’ला विरोध झालेला नाही.
दरम्यान, वाल्हेकरवाडी येथील नागरिकांसमवेत आज “टीपी स्कीम’ची माहिती देण्यासाठी महापालिका भवनात बैठक झाली. बैठकीमध्ये नगररचना विभागाचे उपसंचालक पवार यांनी टीपी स्कीमबाबत सविस्तर माहिती दिली. अहमदाबादच्या धर्तीवर तसेच पीएमआरडीए आणि नागपूर महानगरपालिकेने कशा पद्धतीने टीपी स्कीम राबविली, याची माहिती घेऊन त्याबाबतची प्रश्नावली महापालिका प्रशासनाकडे नागरिकांमार्फत मांडण्यात येणार आहे. नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी याबाबत पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
टीपी स्कीममध्ये नागरिकांना मिळणारे फायदे
हरित क्षेत्रातील जागेच्या मोबदल्यात निवासी क्षेत्रात निम्मी जागा मिळणार
संबंधित जागेच्या आजुबाजुला किमान 9 मीटरच्या रस्त्यांचा विकास
प्राथमिक शाळा, बगीचा, खेळाचे मैदान, स्मशानभूमी सुविधांचा विकास
भूखंडधारकाला त्याच्या मूळ जागेला लागू असलेला
चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मूळ जागेलाही होणार लागू
बांधकाम परवानगी घेऊन केलेले बांधकाम शक्यतो वाचविण्यावर भर
आरक्षित क्षेत्रातील जागेचाच महापालिका घेते ताबा
चिखली, बोऱ्हाडेवाडी, रावेत, पुनावळे, ताथवडे ही गावे टीपी स्कीममधून वगळण्यात आल्याने आता वाल्हेकरवाडी आणि थेरगाव येथेच पहिल्या टप्प्यात टीपी स्कीम राबविली जाईल. तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील हरित क्षेत्रात “टीपी स्कीम’ राबविण्यास नागरिकांची हरकत नसल्यास केवळ हरित क्षेत्रापुरती ही योजना राबविण्यात येईल. टीपी स्कीममध्ये रस्त्यांची जागा ताब्यात येण्यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागेल. तर, आरक्षणांच्या जागा ताब्यात येण्यासाठी तीन वर्ष लागतील. टीपी स्कीमबाबतची माहिती महापालिका संकेतस्थळावर दिली जाणार आहे. तसेच, त्याबाबतच्या प्रमुख प्रश्नांची उत्तरेही संकेतस्थळावर दिली जातील.
– रा. म. पवार, उपसंचालक, नगररचना व विकास विभाग.