मुंबई – केंद्र सरकारने मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे गुजरातेत गांधीनगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचे हे महत्त्व कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हे केंद्र गांधी नगरला हलवण्याची अधिसूचना नुकतीच केंद्र सरकारने जारी केली आहे.
थोरात यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारचा हा निर्णय निराशाजनक आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे अशी मागणीही थोरात यांनी आपल्या ट्विटर संदेशात केली आहे. या साऱ्या प्रकरणात राज्यातील भाजप नेते मूग गिळून गप्प का आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.