नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध मंत्र्यांशी देशात दिल्या जायच्या दुसऱ्या आर्थिक पॅकेजविषयी चर्चा केली. लॉकडाऊन मुळे देशातील विविध समाज घटकांपुढे ज्या आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले जायचे आहे. त्या संबंधात अर्थमंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशीही सल्लामसलत करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहा आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही मोदींनी स्वतंत्र चर्चा केली. केंद्र सरकारने या महिन्याच्या जीएसटी कलेक्शनचे आकडेही जाहीर केलेले नाहीत. काल शुक्रवारी हे आकडे जाहीर होणे अपेक्षित होते. ठप्प झालेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी खूप काही करणे गरजेचे आहे असे केंद्र सरकारकडे मांडण्यात आले आहे.
विविध उद्योगांनीही केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे प्रथमच सकारात्मक संकेत मिळाले आहेत. कालच पंतप्रधानांनी या संबंधात विमान वाहतूक खात्याचे मंत्री, कामगार तसेच ऊर्जा खात्याच्या मंत्र्याशीही चर्चा केली आहे. देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीच्या संबंधात त्यांनी काल वाणिज्य मंत्र्यांशीही चर्चा केली आहे.
देशातील लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही अर्थचक्र पूर्णपणे सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत देशापुढील अर्थिक अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्या संकटातून देश बाहेर काढण्यासाठी केंद्राने मोठे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी सर्वच घटकांतून होत आहे. अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांनी आपल्या राष्ट्रीय उत्त्पन्नाच्या दहा टक्के इतक्या मोठ्या रकमेचे पॅकेज आपआपल्या देशांत जाहीर केले आहे. भारतातही अशाच पॅकेजची मागणी होत आहे.