यवतमाळ – ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम केले जातेय. ते योग्य नाही. बॅंकांमध्ये 2 लाख कोटींचा घोळ झाला. गुजरातची समस्थ श्रीमंत धेंड त्यात आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. इकडे मात्र, इडी कारवाई करते, असा आरोप शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केला.
विदर्भात शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू आहे. यवतमाळची जबाबदारी अरविंद सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानिमित्त येथे आल्यावर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी या वाशिम-यवतमाळच्या खासदार आहेत. तरीही त्या पक्षाच्या अभियानातून बाहेर का, याबाबत विचारले असता, त्या वैयक्तिक कारणाने बाजूला असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांनी स्वतः पक्षाला सांगितले की मला यातून बाजूला ठेवा. माझी मानसिक स्थिती योग्य नाही. मी योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू द्या, असे सावंत म्हणाले. जे सोबत येतील त्यांना घेऊन काम करू. पक्ष वाढवणे हा अजेंडा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या विदर्भातील अभियानात नागपूरची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे आहे. यवतमाळची जबाबदारी अरविंद सावंत यांच्याकडे, तर गडचिरोलीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. अमरावतीची जबाबदारी गजानन कीर्तीकर यांच्याकडे, तर अकोल्याची जबाबदारी हेमंत पाटील यांच्याकडे आहे. बुलडाणा – संजय जाधव, वाशिम – प्रताप जाधव, भंडारा – प्रियांका चतुर्वेदी, वर्धा – खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे शिवसेनेच्या संपर्क अभियानाची जबाबदारी आहे.
नागपुरात खासदार संजय राऊत म्हणाले, भावना गवळी आम्हालाही दिसत नाही. याचा अर्थ त्या शिवसेनेत दिसत नाही असे नाही. त्यांनी रितसर परवानगी घेतली. भावना गवळी आज नाही. त्यांच्यामागे ईडीने जे काही लावले. त्यामुळे त्यांना कोर्टात जावे लागतेय. महाविकास आघाडीकडे नसलेल्या जागेवर आता आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू. शिवाय विदर्भात 29 भाजपचे आमदार आहेत. त्यावर फोकस करू, असेही संजय राऊत म्हणाले.