आ.डॉ. लहामटे व भांगरे यांची जलसंपदा मंत्र्यासोबत बैठक
अकोले (प्रतिनिधी) – 20 वर्षांपासून आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. त्यांनी केलेल्या आंदोलनास अखेर यश मिळाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार डॉ. किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या झालेल्या बैठकी दरम्यान आज सकाळी मुंबई येथे दिले.
घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी हे गेल्या 20 वर्षापासून संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी के टी वेअरमधून पाणी द्यावे व इतर मागण्यासाठी सतत आंदोलन करत होते. मात्र सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याकारणाने दि. 5 ऑगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करीत विद्युत निर्मितीचे चाक बंद केले होते.
त्यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व अशोकराव भांगरे यांनी आंदोलनकर्त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आज दुपारी 2:30 वाजता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग सचिव लाभ क्षेत्र विकास जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व सबंधित अधिकारी, देविदास खडके, लक्ष्मण गांगड यांच्यात बैठक झाली.
आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती अशोकराव भांगरे यांनी दिली. या आदिवासी शेतकरी प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांनी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुरावा मिळालेले यश म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे व अशोकराव भांगरे यांचे आभार मानले व जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली.