“माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता। कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे।।’ या इलाही जमादार यांच्या पंक्ती गेले काही दिवस सतत आठवतायेत. सभ्य माणूस म्हणजे “जंटलमन’ असं गृहित धरलं तर माणूस रानटी असल्यापासून स्वतःला “जंटलमन’ म्हणवण्यापर्यंतचा प्रवास फारसा लहान नव्हता.
हजारो वर्षे खर्ची पडलीत या प्रवासासाठी. पण जर आपण पुन्हा रानटी, जंगली व्हायचं ठरवलं तर तो प्रवास मात्र खूपच लहान असेल. तो काही दिवसांचा, काही मिनिटांचा किंवा कदाचित काही सेकंदांचाही असू शकतो. किंबहुना आपण तिथं पोचलेलोही असू शकतो, असे विचार हल्ली रोज डोक्यात येतायेत. “जंटलमन’ हा रानटी माणसाचा फक्त मुखवटा होता की काय? आता तोही जीर्ण होऊन फुटला की काय? असे प्रश्न पडू लागलेत.
“जंटलमन’ मुखवट्यापुरताही दिसेनासा झालाय. स्वतःच्या भावनांचा आवेग ज्याला आवरता येतो तो “जंटलमन’ असतो आणि तो तसा असतो म्हणूनच प्रेमानं, आनंदानं जगू शकतो, असं आपल्याला शिकवलं गेलंय. पण कुठल्याही भावनांचा आवेग दडपायचाच नाही, असं बहुतेक सगळ्यांनीच ठरवून टाकलंय. आनंद झाला तरी तो आक्रमकतेनेच साजरा करायचा आणि राग आला तर आक्रमकता दिसलीच पाहिजे; अन्यथा आपण लयाला जाऊ, असंच सगळ्यांचं मत बनलेलं दिसतंय. माणूस व्यक्त होताना आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा, स्थळकाळाचा कसलाच विचार करेनासा झालाय.
“क्रिकेट इज अ जंटलमेन्स गेम’ हे वाक्यही आम्ही आंधळेपणानंच स्वीकारलं. खरं तर प्रत्येक खेळात सभ्यपणा लागतो. क्रिकेटला किमान या बाबतीत वेगळं स्थान द्यायलाच नको होतं. अर्थात आता ते स्थान राहिलंही नाही, हे गुरुवारच्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान सगळ्यांना कळून चुकलं असेल. बाद झालेल्या फलंदाजापुढे आक्रमकपणे नाचून, खिजवून गोलंदाजानं आनंद व्यक्त करणं, फलंदाजाने बॅट उगारून त्याला प्रत्युत्तर देणं आणि सामना बघणाऱ्या प्रेक्षकांनी स्टेडियममधल्या खुर्च्यांची मोडतोड करणं, दोन्ही संघांच्या समर्थकांनी एकमेकांना मारहाण करणं, यातली कोणती गोष्ट सभ्यपणाची आहे? “स्लेजिंग’ वगैरे प्रकार तर क्रिकेटमध्ये सर्रास चालतात. याच क्रिकेटला फिक्सिंगचाही डाग लागलाय.
“जंटलमन’ म्हणवणाऱ्यांची ही कथा; मग आधीच बदनाम असलेल्या राजकारणी लोकांनी दंगा केला, कायदा हातात घेतला, धमक्या दिल्या, सरकारी अधिकाऱ्याला थोबाडीत मारली, तर त्यांना कशाला दोष द्यायचा? त्यांनी हवं त्या व्यक्तीशी हवं तेव्हा उद्धटपणे वर्तन करावं, त्याचे व्हिडिओ व्हायरल व्हावेत आणि नेत्यांचा टीआरपी वाढत राहावा. “यथा राजा, तथा प्रजा’ या न्यायानं जनताही असभ्यपणाचीच “री’ ओढतेय. नेते गणेशोत्सवानिमित्त नाचगाण्यांचे (सॉरी, सांस्कृतिक) कार्यक्रम आयोजित करतात आणि प्रेक्षक खुर्च्या तोडून आनंद व्यक्त करतात.
एकंदरीत, आपण आपल्या मूळ रूपाकडे परत चाललो आहोत. कदाचित आपण पुरते जंगली झालोही आहोत. (किंवा “जंटलमन’च्या मुखवट्याआड अजूनही जंगलीच राहिलो आहोत.) बदललंय ते जंगल. पूर्वी झाडाझुडपांचं होतं; आता कॉंक्रिटचं झालंय. आपल्या आतला रानटी पशू बाहेर काढणारे आणि त्यायोगे स्वतःचा फायदा साधणारे फुटा-फुटावर टपून बसलेत. “मानवी सभ्यता’ हेच मुळी एक प्रदीर्घ नाटक वाटू लागलंय. असं असेल तर मग “जंटलमन’ शब्द तरी कशाला हवा?