गुवाहाटी – आसाम सरकारने तेल व गॅस क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा लागू असलेल्या कालावधीत मुदतवाढ केली असून हा कायदा आता पुढील सहा महिनेही लागू असेल.
या कायद्यानुसार त्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी, कंत्राटी मजूर, चालक, हेल्पर्स आणि टॅंकर वाहतूकदार यांना संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा कायदा खासगी आणि सर्व सरकारी कंपन्यांसाठीही लागू असेल. तेल आणि अन्य इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात हा कायदा 31 डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आला होता.
त्याच्या सहा महिन्याची मुदत लवकरच संपत असल्याने त्याची मुदत आता आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.