नवी दिल्ली :- पावसामुळे श्रीलंकेतील सामने रद्द होत आहेत किंवा व्यत्ययामुळे पुर्ण 50 षटकांचे होत नाहीत, त्यामुळे उर्वरीत सर्व सामने एकतर पाकिस्तानमध्येच हलवले जावेत किंवा अमिरातीत खेळवावे असे मत पाकिस्तान क्रिकट मंडळाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले होते.
त्यावर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तूमच्या देशाची स्थितीच अशी आहे की कोणताही संघ तीथे जाऊन खेळायला तयार नाही. भारतीय संघ तर पाकिस्तानमध्ये खेळणारच नाही व याला कारणीभूत तूम्हीच आहात, अशा शब्दात शहा यांनी सेठी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
आयपीएलचे सामने अत्यंत उष्ण वातावरणात दुबईत खेळवले जातात तर मग आशिया स्पर्धेतील सामनेही तेथेच का खेळवण्याचा निर्णय घेतला नाही. तसेच सध्या पाकिस्तानमध्येही सातत्याने पाऊस पडलेला नाही, त्यामुळे सामने पूर्ण खेळवले जाऊ शकतात मात्र, बीसीसीआय कोणत्याही स्थितीत अनुकुल प्रतिसाद देत नाही, असेही सेठी म्हणाले होते.
त्यावरही शहा यांनी ताशेरे ओढले आहेत. सध्याचे आखाती देशांतील वातावरण अत्यंत उष्ण आहे व अनेक संघांनी तेथे खेळण्याची उत्सूकता दाखवली नाही. त्यातच राजकीय तणावाच्या स्थितीमुळे भारतीय संघ देखील पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. त्यामुळेच ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने श्रीलंकेतही खेळवली जात आहे. खरेतर याला सर्वस्वी पाकिस्तान सरकार, तेथील राजकीय व सामाजीत स्थितीच सर्वात जास्त जबाबदार आहे. त्यामुळे सुरक्षेचा मोठा मुद्दा समोर आल्यावरच आम्ही श्रीलंकेतही काही सामने खेळवण्याचा निर्णय घेतला, असे शहा यांनी सांगितले आहे.
तुमच्या देशातील सुरक्षा आणि आर्थिक परिस्थिती पाहता केवळ चारच सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यास अन्य संघांनी होकार दिला. खेळाडूंच्या बाबत त्या त्या देशांच्या क्रिकेट मंडळांकडून मत मागवले गेले होते. त्यावेळी अनेक संघांनी सप्टेंबर महिन्यात अमिरातीत खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. अशा वेळापत्रकामुळे खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागला असता. तसेच आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना कोणताही संघ इतक्या प्रवासाचा तसेच सराव किंवा सामन्यांदरम्यानच्या दुखापतींचा धोका पत्करण्याच्या तयारीत नव्हता. कोणताच संघ तुमच्या देशात संपूर्ण आशिया कप खेळण्यास तयार नव्हता, असेही शहा म्हणाले.
म्हणूनच सर्वमान्य तोडगा काढला…
आशिया क्रिकेट समितीचा (एसीसी) अध्यक्ष या नात्याने मी सर्वांसाठी एक सर्वमान्य तोडगा काढला व सर्वाधिक सामने श्रीलंकेत खेळवण्याचे निश्चित केले. तसेच हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सामन्यांसाठी करातून सूट आणि विमा यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत काही वाटाघाटी झाल्या व त्यामुळेच श्रीलंकेला प्राधान्य दिले गेले, असेही ते म्हणाले.