मुंबई :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची रचना पाहता परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात अवघ्या 15 दिवसांत तीन वेळा सामना होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जरी अद्याप पूर्ण जाहीर झालेले नसले तरीही साखळी, सुपर फोर व अंतिम अशा सामन्यात हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले असले तरीही यातील केवळ चारच सामने पाकिस्तानमध्ये तर तब्बल 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्यातही भारतीय संघाचे सर्व सामने दम्बुलात होणार आहेत. ही स्पर्धा येत्या 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान गटसाखळीत 2 सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात. स्पर्धेत एकूण सहा संघ असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये तीन संघांचे दोन गट आहेत.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात.
तसेच भारत आणि पाकिस्तान संघ अंतिम फेरीत दाखल झाले तर पुन्हा एकदा त्यांच्यात लढत होईल. म्हणजेच 15 दिवसात तीनदा हे दोन्ही संघ आमने सामने येतील.
गेल्या वर्षी आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली नव्हती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला होता.
सुपर 4 मध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता व त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. अंतिम फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार..
आशिया स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक येत्या बुधवारी जाहीर होणार असल्याचे संकेत आशिया क्रिकेट समितीने दिले आहेत. हायब्रीड मॉडेलला असलेला पाकिस्तान क्रिकेट विरोध मावळला आहे.