नगर – शहरातील कायदा- सुव्यवस्था बिघडली असून याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले आहेत. रात्री 11 नंतर हॉटेल, परमीट रुमसह इतर आस्थापना पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ओला यांनी दिले असून दोन वेळा कारवाई करूनही या आस्थापना सुरू झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले अवैध धंदे, हॉटेल व चौका-चौकात उशिरापर्यंत थांबून असणारी गर्दी मोठ्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरूणांकडून केला जात आहे. तलवार, कोयता, गावठी कट्ट्यांचा वापर सर्रास वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अधीक्षक ओला यांनी शहर पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी रात्री त्यांनी पथकासह तोफखाना हद्दीत अनेक ठिकाणी नाकबंदी केली. दुचाकीवरून फेरफटका मारत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करून शांततेचा भंग करणाऱ्या नऊ व्यक्तींविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 व 117 प्रमाणे कारवाई केली. याशिवाय दारूबंदी अधिनियमानुसार दोघांवर, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकाविरूध्द कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री 11 वाजेनंतर आस्थापना बंद ठेवण्याचे सांगितले होते. त्याची अंमलबजावणी काही दिवसच झाली. पोलिसांनाही याचा विसर पडला. दरम्यान, यापुढे वाईन शॉप, परमीट रूम, हॉटेलसह इतर आस्थापना 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधीक्षक ओला यांनी दिले. तसेच दोन वेळा कारवाई केल्यानंतर तिसऱ्यांदाही संबंधीत हॉटेल, परमीट रूम सुरू असल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याबाबत पोलिसांना आदेश दिले असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.