मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मागील काही दिवसांपासून भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या याच टीकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी “तुम्ही तुमचं नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा” असा खोचक सल्ला अंधारेंना दिला आहे. तर दुसरीकडे अंधारेंनी देखील त्यांच्या खोचक टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी “स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही”, असे म्हटले. तर आता त्यांचा टीकेला उत्तर देताना “राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य तुम्हाला करावी लागत आहेत. मात्र, अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांचे हाल काही काळानंतर काय होतात, हे मनिषा कायंदेंना विचारा”, असंही शेलार अंधारेंना उद्देशून म्हणाले आहेत. “आम्ही आगलावे असू तर हवेत गोळीबार करणारे सदा सरवणकर कोण आहेत? जे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात, जे संजय गायकवाड ‘चून चून के मारेंगे’ म्हणतात, आम्ही हिशोब चुकता करू, अशी जाहीर गुंडांची भाषा तानाजी सावंत करतात, या सर्वांना काय उपाधी द्याल?”, असा प्रतिप्रश्न अंधारेंनी शेलार यांना केला आहे.
गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार निव्वळ मवाल्यांसारखी भाषा करतात, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी त्याठिकाणी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. यावरुनही शेलार यांनी ठाकरे गटाला सवाल विचारला आहे. “शुद्धीकरणाचा अशुद्ध विचार आपल्या मनात का रुजला हा आमचा प्रश्न आहे”, असे शेलार म्हणाले आहे.
दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करायला जाताना खंजीर बाजूला ठेवून जा, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला होता. “बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आम्ही शस्त्र-अस्त्र घेऊन जात नसतो. त्यांच्याकडून विचारांचं शस्त्र घेत असतो”, असे प्रत्त्युत्तर शेलार यांनी राऊतांना दिले आहे.