मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी रात्री लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. जनतेचे, मित्रपक्षांचे आणि शिवसैनिकांचे आभार मानत त्यांनी सत्तेला “जय महाराष्ट्र’ केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ता गमावली आहे. आता राज्यात सत्ताबदल होणार आहे. त्यातून सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा होणार आहे. आता शिवसेनेतील बंडखोर गटासह नव्या सरकारची रचना कशी असणार याविषयी उत्सुकता असेल.
यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घटनांवर प्रतिक्रिया देतांना एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले,’भाजपाचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार मानले. “अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असंही ते म्हणाले.
दरम्यान, “येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. फडणवीस सरकारचा शपथविधी 1 जुलैला होणार असल्याच्या चर्चांवर फडणवीस यांनी पत्रकरांशी बोलतांना अप्रत्यक्षपणे होकार दिला आहे.