ज्ञानेश्वर फड/प्रीतम पुरोहित
पुणे – पायीवारी काळात अनेक वारकरी आजारी पडतात. चालून थकतात. पावसाळ्यामुळे हवामान बदल, तीन जिल्ह्यांतून होणारा प्रवास, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची हिच सुश्रुषा गेल्या 30 वर्षांपासून माउली चॅरिटेबल ट्रस्ट निःशुल्क करत आहे. याचबरोबर आळंदी ते पंढरपूर अशी मेडिकल दिंडीदेखील असते. वारीत विठुरायाची भक्ती तर होते पण भुकेचे काय? म्हणून सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम वारी प्रवासात पाच ठिकाणी जेवणही पुरवते. हे सगळे निःशुल्क असून, या उपक्रमाला आता 30 वर्षे पूर्ण होत आहेत.
असा आहे उपक्रम
मुंबईच्या डॉ. दीपक मोहिते यांना वारी काळात आपण मोफत वैद्यकीय सेवा देण्याची कल्पना सुचली. त्यांनी 1993 मध्ये माएली चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. सुरुवातीला सोबत खूप कमी लोक होते. आज मात्र 150 पेक्षा अधिक डॉक्टर्स या टीममध्ये आहेत. यात एमबीबीएस, एमडी, एमएस, बीएएमएस, बीएचएमएस, नर्स असे कित्येक जण सेवा करत आहेत.
याचबरोबर माजी सरकारी अधिकारी, मोठ्या हुद्द्यावर काम करणारे, अनेक सर्व सामान्य लोक या ट्रस्टमध्ये येऊन आपली सेवा करतात. काही लोक मुंबईहून आधीच पालखीस्थळी येतात. सर्वजण आपाल्यापरीने खर्च करत वारकऱ्यांना मदत करतात.
“वारी काळात जेजुरी, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर येथे अन्नदान करतात. या ठिकाणी वारकऱ्यांची खूप मोठी संख्या असते. त्यामुळे त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आम्ही थोडा हातभार लावतो,’ असे येथील डॉक्टर सांगतात.
वारकरी म्हणातात…
“वारीमध्ये आम्ही आजारी पडलो, तर कोठे जायचे हे आम्हांला माहिती आहे. आमची माउली तिथेच असणार आणि आम्हाला तपासून लवकरात लवकर तुम्ही बरे होणार, असे म्हणत औषधे देणारे डॉक्टर्स नर्सेस तेथेच असणार,’ असा विश्वास ते व्यक्त करतात.
डॉक्टर म्हणतात…
“वारकऱ्यांचा अनुभव, त्यांची विठ्ठलाप्रती भक्ती, वारीला कित्येक वर्षानुवर्षे येण्याची परंपरा हे सर्व पाहून त्यांच्याकडून खूप काही आम्हांला शिकायला मिळते. त्यांची सेवा केल्याने वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते,’ असे डॉक्टर्स सांगतात.
वारी काळात सेवा
माउली ट्रस्टच्या रुग्णसेवेचा शेकडो वारकरी लाभ घेतात. त्यांना सर्दी, ताप, थंडी, अजीर्ण, पित्त, अंगदुखी यांच्यावर औषधे दिली जातात. याशिवाय मधुमेह, ब्लडप्रेशर तपासणीही केली जाते. त्याचबरोबर रक्त, लघवी, तपासणी करण्यात येते. प्राथमिक आरोग्य तपासणी आणि उपचारही केले जातात. यासाठी डॉक्टर्स, नर्सेसचे गट शिफ्टनुसार सेवा देतात. वारी काळात 24 तास त्यांची ही टीम कार्यरत असते.