नवी दिल्ली: पालघर येथील साधूंच्या हत्या प्रकरणात आक्षेपार्ह रिपोर्टिंग करून धार्मिक द्वेष निर्माण केल्याच्या आरोपाखाली ज्येष्ठ पत्रकार व रिपब्लिक टीव्हीचे चालक अर्णब गोस्वाम यांच्या विरोधात महाराष्ट्रात एक गुन्हा दाखल झाला आहे.
हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे किंवा आपल्यावरील गुन्हाच रद्द करावा, अशी गोस्वामी यांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तथापि कोर्टाने त्यांच्या अटकेला पुन्हा तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
पत्रकारितेचे स्वातंत्र्य हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया आहे असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले विविध राज्यांमधील गुन्हे रद्द बातल ठरवत केवळ नागपुर मध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा कायम ठेवला आणि त्याचा तपास नंतर मुंबईत वर्ग करण्यात आला. त्या प्रकरणात गोस्वामी यांची पोलिसांनी चौकशीही केली आहे.
पण त्यांच्या अटकेला मात्र कोर्टाने त्यावेळी स्थगिती दिली होती. त्याची मुदत आता आणखी तीन आठवडे वाढवण्यात आली आहे. तथापि हा गुन्हाच रद्द करा किंवा त्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.