नवी दिल्ली – न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आपल्या व सहकारी खेळाडूंच्या अपयशी कामगिरीवर पांघरुण घालण्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेला प्रयत्न चिंताजनक असल्याची टीका माजी कसोटीपटू व समालोचक आशिष नेहरा याने केली आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत निर्विवादरीत्या जिंकला. मात्र, त्यानंतरच्या कसोटी व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संघाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. एकदिवसीय मालिका पार पडल्यावर हा पराभव आमच्यासाठी फारसा महत्त्वाचा नाही. यंदाच्या मोसमात आम्ही कसोटी व एकदिवसीय सामने जास्त खेळणार नसल्याने सध्या तरी टी-20 बाबतच विचार करत आहे असे कोहली म्हणाला होता. त्यावर नाराजी व्यक्त करत नेहराने न्यूझीलंडला गेलाच का असा सवालही विचारला आहे.
भारतीय संघाने टी-20 मालिका 5-0 अशी जिंकून यजमान न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला. मात्र, त्यानंतर कसोटी व एकदिवसीय मालिकेत भारतीय संघालाच व्हाइटवॉश स्वीकारावा लागला होता. त्यावेळी कोहलीने केलेले विधान अत्यंत बेजबाबदार होते. त्याला जर एकदिवसीय मालिकेतील पराभवाचे शल्य वाटत नसेल तर ही मालिका भारतीय संघाने खेळायलाच नको होती. जर पराभवाचे आत्मपरीक्षण करणार नसाल तर मग न्यूझीलंडला कशासाठी गेला होता, असे नेहराने संतापाने विचारले आहे. माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याच्याशी सोशल मीडियावरील एका मुलाखतीत नेहराने आपली मते मांडली.
नेहरा सातत्याने केवळ कोहलीवरच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंवर टीका करताना दिसत आहे. कसोटी मालिका किंवा एकदिवसीय मालिका तसेच टी-20 क्रिकेट असो जर संघाने त्यात सहभाग घेतला असेल तर त्यात सर्वोत्तम खेळ व्हावा यासाठीच कर्णधाराने आग्रही असायला हवे, असेही नेहराने व्यक्त केले.
गांगुली व धोनीमध्ये साम्य….
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सौरव गांगुली व महेंद्रसिंग धोनी यांनी यशस्वी कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंमध्ये तसे बराच फरक सांगता येईल मात्र, त्यांच्यात एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे हे दोघेही नवोदित खेळाडूंना जास्तीत जास्त संधी व प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंच्याबरोबरीने नव्या खेळाडूंनाही पाठिंबा दिला, असेही नेहरा म्हणाला.