कोलकाता – पश्चिम बंगाल मधील तीन जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून त्या जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराच्या सात कॉलमचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
या तीन जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून अभुतपुर्व पाऊस पडला आहे. पश्चिम वर्धमान, हुगळी आणि हावडा हे पुराचा जोरदार तडाखा बसलेले तीन जिल्हे आहेत. लष्कराने तेथील 91 जणांना आत्तापर्यंत वाचवले आहे. लष्कराखेरीज तिकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण तसेच अन्यही मदत पथके कार्यरत आहेत.
पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील असनसोल येथे तर ढगफुटीच झाली. तेथे गेल्या 24 तासांत तब्बल 434 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर बंकुरात 354 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डुंगरपुर, पुरूलिया, कंगसबती, फुलबेरिया अशा ठिकाणीही मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.