नवी दिल्ली – केवळ गेल्या दीड दशकांत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची अथवा आघाडीची मोठी वाताहत झाली आहे. तीन दशकांपासून या राज्यात सत्तेवर असलेली डावी आघाडी केवळ सत्तेतूनच नाही तर राज्याच्या व्यापक राजकीय पटलावरून जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊन पोहोचली आहे. तर केंद्रात सत्तेवर असलेली भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. जवळपास साडेतीन दशके बंगालमध्ये डाव्या आघाडीची राजवट होती. आज स्थिती अशी आहे की या राज्याच्या विधानसभेत आज त्यांचा एकही आमदार नाही.
केंद्रातही सत्ताधारी आघाडीत राहीलेल्या डाव्या मोर्चाचा बंगालमधून लोकसभेवर आज एकही खासदार नाही. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना येथून एकही जागा जिंकता आली नाही. आता २०२४ च्या निवडणुकीत डाव्या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकरता करो अथवा मरो अशी स्थिती असल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. एकेकाळी केंद्रातील सरकारला पाठिंबा देऊन अत्यंत महत्वाचे स्थान असणारा हा पक्ष आज राजकीय दृष्ट्या केवळ केरळ या एकमेव राज्यात बलशाली आहे.
अर्थात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या २० पैकी एकच जागा या पक्षाला जिंकता आली होती. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून पक्षाची जी सातत्याने अवस्था होत चालली आहे त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच बंगाल विधानसभेचा निकालही डाव्या मोर्चासाठी हादरा देणारा ठरला होता. २०२१ च्या निवडणुकांमध्ये केरळ आणि त्रिपुरा या आपल्या बालेकिल्ल्यात त्यांना खातेही उघडता आले नव्हते. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसच्या तडाख्यात डाव्यांचा बंगालचा किल्ला ढासळला. त्याची पडझड अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे १९७७ पासून २०११ पर्यंत या राज्यात तेच सर्वशक्तीमान होते.
आज राज्यात पक्षाची अशी स्थिती आहे की इंडिया आघाडीच्या जागावाटपाची बोलणी जेंव्हा सुरू होती तेंव्हा डाव्यांना ४२ पैकी १ जागाही देण्यास ममतांनी नकार दिला होता. डावा मोर्चा आणि कॉंग्रेस हे दोघे बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे एजंट असल्याचा गंभीर आरोप ममतांनी केला आहे. त्यांनी राज्यात कोणाशीही जागावाटप करण्यास नकार तर दिलाच वर असाही दावा केला की डाव्यांप्रमाणे कॉंग्रेसही बंगालमध्ये संपुष्टात येईल.
गेल्या निवडणुकांमधील पराभवांनंतर माकपने एक गोष्ट स्विकार केली आहे की आता कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांचा जनाधार राहीलेला नाही. त्यामुळे आता पुढचा प्रश्न असा आहे की गमावलेला जनाधार पुन्हा प्राप्त करण्यासाठी डाव्या पक्षांकडे कोणती रणनीती आहे का? तृणमूलप्रमाणेच भाजपही असा दावा करते की येत्या काही दिवसांत डावा मोर्चा आपले अस्तित्व गमावून बसणार आहे.
एकेकाळी ज्योती बसु, बुध्ददेव भट्टाचार्य, माणिक सरकार आदी मोठे आणि प्रबळ चेहरे असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आज व्यापक जनाधार असलेला एकही नेता दिसत नाही. तसे जर असेल तर गेलेला जनाधार परत मिळवणे त्यांच्यासाठी अत्यंत अवघड कामगिरी ठरणार आहे.