हवामानात सतत बदल : शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम
बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून थंडी गायब झाली आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाली आहे. यावर्षी जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात थंडी वाढली होती. सतत होणाऱ्या हवामानाच्या बदलामुळे थंडी गायब झाली आहे. थंडीमुळे ज्वारी, बाजरी, कांदे, हरभरा, वाटाणा या रब्बी पिकांना चांगलाच फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु पिकांवर रोगाचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी हताश झाला आहे.
यावर्षी तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी जुन्नरच्या पूर्व भागातील बेल्हे, राजुरी, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव, जाधववाडी, तांबेवाडी, बोरी, बांगरवाडी, गुंजाळवाडी या ठिकाणी पाण्याचे क्षेत्र जास्त आहे. पिंपगाव जोगे व कुकडी कॅनॉल तसेच कुकडी नदी या गावातून जाते तरीही या गावांमध्ये थंडीचा जोर दिसून आला नाही. आणे पठारभागावरील आनंदवाडी, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा या ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे वाटाणा, कांदा, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.