रावणगाव – सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दौंड तालुक्यातील आंबा पीक अडचणीत सापडले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्रच पावसाचे प्रमाण जास्त आहे, त्यामूळे या वर्षी आंब्याला मोहोर येतो की नाही अशी शंका निर्माण झाली होती. परंतू या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरळक मोहोर येत असल्यामुळे यंदा आंब्याची चव महाग होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साधारणपणे आंब्याला मोहोर आल्यानंतर आंबा परिपक्व होऊन बाजारात दाखल होईपर्यंत पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. आता निघालेला मोहोर सेट होण्यासाठी एक महिना लागतो, म्हणजे मार्च महिन्यात सेटींग जर झाले व उन्हाची तीव्रता वाढली तर वाढत्या उन्हाचा फटका बसल्यामळे मोहोर व फळे गळतात.
जरी फळधारणा झाली तरी आंबा पिकण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागतो म्हणजे हा आंबा बाजारात दाखल होण्यास जून – जूलै महिना उजाडणार. हा पावसाळयाचा कालावधी असल्याने या दिवसात कोणीही आंबा खरेदी करत नाही. त्यामूळे आंबा उत्पादकांचे या वर्षी अतोनात नुकसान होईल.