मागच्या काही महिन्यांपूर्वी मी एका सौंदर्यवती स्पर्धेत भाग घेतला होता. प्रश्न उत्तरांच्या फेरीत मला प्रश्न विचारला गेला संस्कृती म्हणजे काय? पुढच्या पिढीला ती कशी पास करता येईल? आणि पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती पोचवण्यात काय अडथळे आहेत?
एक लेखिका म्हणून या प्रश्नाचे उत्तर देणे हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग काम होतं. अर्थात मी ते समाधानकारक उत्तर दिलेही. खरंतर आपली संस्कृती ही कुठल्याही जाती धर्माशी निगडित नसून ती आपल्या भारतीय लोकांची जगण्याची पद्धती, भाषा, खाद्य संस्कृती, पेहराव, मानपान देणे आणि सणवार साजरे करणे याच्याशी संबंधित आहे. पण त्यातला तिसरा प्रश्न जो आहे त्यात प्रकर्षाने मला जाणवलेला अडथळा म्हणजे सध्या प्रचलित असणाऱ्या वेब सीरिज. खरंच सध्याच्या पिढीला आपली संस्कृती म्हणजे काय हे दाखवणे आणि त्यांच्या मनात ती रुजवणे हे काम बऱ्याचशा वेब सीरिजने अवघड करून ठेवलंय.
यातच भर टाकली आहे ती म्हणजे सध्या चालू असलेला “आदीपुरुष’ हा सिनेमा. अगदी त्याच पठडीतला नसला तरी आपल्या संस्कृतीची वाताहात लावायचं काम मात्र अगदी योग्य करतोय, असे चित्रपटाचे रिव्ह्यू पाहून कळतेच. चित्रपटाची समीक्षा बराच वेळा ऐकण्यात आली असेल. यातून पुढच्या पिढीला आपली संस्कृती आणि देवाधर्माच्या नावाखाली आपण काय देणार आहोत, असा सवाल प्रत्येकाच्या मनात उभा राहतोच.
मला असं वाटतं की त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वेब सीरिजमध्ये “दारू’ आणि अश्लील शब्द इतके वापरलेले असतात की सर्वसामान्यांच्या पचनी पडेल अशी ना त्यांची भाषा असते ना त्यात दाखवलेली दृश्य. कधी कधी अशा वेब सीरिजचा मुख्य विषय कितीही चांगला असला तरी तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा दृश्यांची आणि भाषेची गरज या कथानकाला का पडते, तेच कळत नाही. मुख्य कथेचा आणि या अशा बटबटीत दृश्यांचा किंवा एखाद्या ठराविक कम्युनिटीतील लोकांचा काहीही संबंध नसतानाही उगाचच अशा कम्युनिटी बद्दल आपला किती सहिष्णू आणि उदात्त हेतू आहे हे दाखवण्याचं काम या वेब सीरिज करतात, असं वाटून जातं.
मध्यंतरी “क्लास’ नावाची एक वेब सीरिज पाहण्यात आली. वेब सीरिज पाहून त्यातील सर्वच गोष्टींचा अगदी उबग यायला लागला. आणि माणसे आणि जनावरे यांच्यात काही फरक आहे की नाही अशी शंका येऊन गेली. प्राणीसुद्धा निसर्ग नियमाविरुद्ध जाऊन काही करत नाही पण मनुष्यप्राणी मात्र समाजबाह्यवर्तन करून हेच प्रमोट करत असल्याचे दिसते.
बऱ्याच वेब सीरिजमध्ये “दारू’ आणि अश्लील शब्द वापरला की मग ते पात्र एकदम कुल आणि पुढारलेले आहे, असा कदाचित या लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. काही लोक तर हे असे काहीतरी विकृत दाखवून त्याला “अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असं गोंडस नावही देतात.
‘डहश’
नावाची वेब सीरिज पाहून तर त्या अभिनेत्रीची किवच आली. अशा उत्तान दृश्यांचे चित्रीकरण करताना अभिनेत्रींना तर खूपच खालच्या पातळीवर जाऊन टिकून राहण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. भूमिकेला न्याय देण्यासाठी किंवा कथानकाची गरज म्हणून आम्ही करतो, असे पण त्यांचे म्हणणे असते.
सगळ्यांची गरज काही ना काही असते पण म्हणून योग्य काय अयोग्य काय हे कळण्याची समज न आलेली पौगंडावस्थेतील पिढी पण या असल्या वेब सीरिज पाहतात. त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम तर होतोच पण वयाने मोठे असणारे सर्वजण फार समंजस किंवा कळते असतात, असेही नव्हेच. समाजात वाढणारे विविध प्रकारचे गुन्हे, स्त्रिया, मुली व मुलांवरील अत्याचार, कोयता गॅंग प्रकरण हे सर्व या सर्वांचे परिणाम आहेत, असे वाटत नाही का? नको त्या भलत्याच गोष्टी प्रमोट केल्याने हिंसा मग ती कोणत्याही प्रकारची का असेना गैर परिणाम करतेच.
खरंतर हा काळजी करण्याचा विषय आहे. कमावणारे यातून चांगले कमवतात आणि त्यात काम करणारी वाटेल ते, सांगेल तसे करतात. काही प्रेक्षक शिव्या देऊन तर काही मिटक्या मारत बघतात. पण हे असेच बेमालूमपणे सुरू राहिले तर आपली भावी पिढी नक्की काय शिकेल आणि काय करेल हा प्रश्नच आहे.
मग यावर उपाय काय? बऱ्याच जणांना वाटते अशा वेब सीरिज पाहण्यावर बहिष्कार टाकायला हवा. पण प्रॅक्टिकली विचार केला तर असे होऊ शकत नाही. कारण बहिष्कार टाकायचा ठरवला तरी भावी पिढी कुठून ना कुठून हा सर्व कंटेंट मिळवूच शकते.
काही लोकांना वाटते की या अशा वेब सीरिज समाजाचा आरसाच आहे. असे प्रत्यक्षात आजूबाजूला घडत आहे. त्यामुळे त्यात दाखवतात ते सर्वच काही खोटं नाही. झेपेल तेवढे बघा नाहीतर बघू नका.
खरंतर हा पर्याय प्रत्येकासाठीच उपलब्ध आहे. जसे की टीव्ही पाहायचं नसेल तर बंद करा. पण मला असे वाटते की न बघून तुमच्यापुरता प्रश्न मिटेल, पण भावी पिढी आणि समाजाची अजूनच होणारी हानी कशी भरून निघेल?
आपण बघायचं बंद केल्याने प्रश्न सुटणारा नाही. कारण या काही बाजारू वेब सीरिजमुळे हल्ली समाजात वाईट प्रवृत्ती वाढायला लागली आणि कोणी एकटं याला थांबवू शकत नाही, असेही बऱ्याच जणांचे मत आहे. पण हा विचार केल्यावर सर्व पुन्हा “अंडे आधी की कोंबडी’ या एकाच प्रश्नावर येऊन थांबते. या अशा वेब सीरिज पाहून समाज बिघडतो किंवा समाजावर परिणाम होतो की समाजात सध्या अशा वाईट प्रवृत्ती चालू आहेत त्याच वेब सीरिजमध्ये दाखवतात हा खरोखर ग्रहन प्रश्न आहे.
बऱ्याचदा ही डिमांड प्रेक्षकांचीच आहे असेही दाखवले जाते.पण कधी कधी मात्र काही विकृत लोकांच्या डोक्यातील खूळ वाटते.
“हे हल्ली सर्व चालतेच, हे तर नॉर्मलच आहे सध्या’ असे सतत ठसवण्याचे कामही काही लोक करतात. काही तुरळक अपवादही आहेत. कधी कधी एखाद्या वेब सीरिजची थीम, कथानक किंवा कंटेंट चांगलाही असतो पण ते प्रेझेंट करायची ती भाषा, हिंसा आणि सेक्स हे सर्व अंगावर येते. प्रेक्षकांना ते पाहण्यासाठी काही वयोमर्यादा नसल्यामुळे कोणत्या वेब सीरिज मधून काय बोध होतो हे ज्याच्या त्याच्या मॅच्युरिटीवर अवलंबून आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक सुदृढता हवी असेल तर काही गोष्टी या ठराविक वयातच समजायला हव्यात. नाहीतर हल्लीच्या मुलांचा माध्यमांचा अविवेकी वापर पाहता “शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ हा शिक्षकांच्या व पालकांच्या चिंतेचा विषय बनायला वेळ लागणार नाही.
कोण जाणे अजून असे कितीतरी प्लॅटफॉर्म्स असतील ज्यात त्यांच्या कंटेंटमुळे सामाजिक व्यवस्था धुळीस मिळत असेल. असं म्हणतात आपली प्रसार माध्यमं आणि चित्रपट म्हणजे आपल्या समाजाचा आरसा असतो. पण समाज प्रबोधनासाठी सुरू झालेलं हे क्षेत्र कुठे जाऊन पोहोचलंय आणि समाजाला कुठे नेऊन पोहोचवणार हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे अशा वेब सीरिजला सेन्सॉर हा असायलाच हवा. हाच अशा वेब सीरिजला मर्यादा घालण्याचा उत्तम उपाय आहे. चांगला आणि बाजारू कंटेंट यातील फरक करूनच अशा वेब सीरिजला परवानगी द्यायला हवी. शेवटचा पर्याय म्हणजे अगदी काहीच नाही झाले तरी आपण अशा ठराविक वेब सीरिजवर बहिष्कार टाकायला हवा. किमान स्वतःपुरता तरी असा बदल करायला हवा.
– तेजस्वी दळवी