निसर्गाने कोणाला जास्त उंची दिलेली असते, तर कोणाला कमी, तसेच निसर्गानेच कोणाला जलद गतीने विचार करण्याचे वरदान दिलेले असते, तर कोणी संथ गतीने विचार करतो. आपली विचार करण्याची गती नेमकी कशी आहे याविषयी थोडेसे…
सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार चालूच असतात. आपल्याला काहीतरी व्यवधाने असतात. काही कामे आपल्याला पूर्ण करावयाची असतात. आपण घड्याळाच्या काट्याला एक पाय बांधून ठेवून नुसते धावत असतो. त्या फिरणाऱ्या काट्यापेक्षा आपल्या डोक्यातील विचार चक्रे जास्त फिरत असतात. आपले मन व मेंदू विजेच्या वेगाने विचार करीत असते. आपल्याला लक्षात येत नाही, पण निर्णय घेण्याची प्रक्रिया ही मेंदूमध्ये अत्यंत गुंतागुंतीची असते आणि मनाचा तर काही थांगच लागत नाही. त्यामुळे मनातील हालचाली या मूर्त स्वरूपात असत नाहीत.
आपल्याला जे शरीर मिळालेले आहे त्याची क्षमता खरे तर खूपच आहे; पण आपण पूर्ण क्षमतेने वापरच करत नाही. आपण आपल्या मेंदूच्या क्षमतेच्या सुमारे 10 टक्केच वापर करत असतो. उर्वरित क्षमता आपण वायाच घालवित असतो. ज्या व्यक्ती संथ गतीने विचार करू शकतात त्यांनी आधी स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे. आपल्यातील उणिवेच्या बाजू आपल्याला पूर्णपणे माहीत असणे हीपण एक जमेची बाजू असते. आपल्यातील उणिवा आपण इतर काही उपाययोजना करून कधी पूर्णपणे तर कधी अंशतः भरून काढू शकतो. दुसऱ्यांचे विचार ऐकून घेऊन त्यावर विचार करू शकतो. जर आपल्याला फायदा होणार असेल तर त्या विचारांचा स्वीकार करावा नाहीतर सोडून द्यावा. पण खरेच आपल्याला फायदा होणार आहे की नाही, याचा विचार आपल्यालाच करावा लागतो, त्याबाबतीत दुसऱ्यांचे ऐकून चालत नाही.
आपली विचार करण्याची प्रक्रिया संथ आहे की जलद हे ओळखण्यासाठी आपण थोडेसे आजूबाजूच्या व्यक्तींचे निरीक्षण करावयास हवे. एकाच समस्येचे उत्तर शोधण्यासाठी दुसरी व्यक्ती कमी वेळ लावेल, तर आपल्याला तेच उत्तर मिळविण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आपणच आपले आपल्यावर लक्ष ठेवावे, जसे एखादा विचार जेव्हा प्रथम आपल्या डोक्यात येतो, तेव्हा त्या विचाराचे थोडावेळ देऊन सिंहावलोकन करावे. एखादा विचार डोक्यात येण्यासाठीचा कालावधी किती असेल हे काहीच सांगता येत नाही. जसे एक सेकंदापासून ते पुढे कितीही काळ असू शकतो. आपल्या डोक्यात आलेल्या विचारावर आपण जेव्हा काही प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करू त्यावेळी अशा प्रकारे सिंहावलोकन करावे. यावरून आपल्या लक्षात येईल की, आपली विचार करण्याची क्षमता ही जलद गतीने आहे की संथ गतीने.
आपण आपल्या कामाबाबत गाफील राहिल्याने, दुसऱ्याची क्षमता ओळखण्यात चूक केल्याने किंवा अति आत्मविश्वास दाखविल्याने आपण जास्त विचार करत नाही. खरे तर आपल्यात विचार करण्याची क्षमता असते; पण ती वापरण्याचा आपण प्रयत्नच करत नसतो. आपल्याकडून चुका होऊ न देता पूर्णपणे शंभर टक्के क्षमतेने आपली ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रयत्नांमुळे आपली विचार करण्याची जी काही गती असेल ती वापरून आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.
आपण ज्या क्षेत्रात आपल्याला ज्ञान, माहिती, कौशल्य आहे ते क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात आपला अधिकार दाखवतो आणि चूक करून बसतो. आपली विचार करण्याची क्षमता इतर क्षेत्रात अगदी प्रभावीपणे काम करेल असे नाही. त्याला कारण आपल्या विचारांच्या गतीला ज्ञान, माहिती कौशल्य व इतरही काही घटकांची जोड असते. आपल्याला इतर क्षेत्रात वावरताना बऱ्याच मर्यादा पडत असतात. अशा प्रकारे आपणच आपल्यावर बंधने घालून इतर क्षेत्रात शिरायचे नाही. जर इतर क्षेत्रात शिरायचे असेल, तर तयारीनिशी शिरावे.
जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायला फारच कमी वेळ मिळतो, अशा वेळी आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेला अधिक गतिमान करण्यासाठी आपल्याकडे माहिती, ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी ज्ञान-माहिती कणाकणाने जेथून मिळेल तेथून गोळा करीत राहावयाचे. वाचन-निरीक्षण करीत राहावे. एकदा सुप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट एका अरण्यात नरभक्षक वाघाला मारण्यासाठी हिंडत होते. अचानक तोच वाघ जिम कार्बेट यांच्या समोर आला. दोघांमध्ये काही फुटांचे अंतर होते. दोघेही अगदी स्तब्ध उभे होते. वाघ कोणत्याही क्षणी हल्ला करू शकत होता.
जिम कार्बेट यांनी खांद्यावरची बंदूक काढून वाघाच्या दोन डोळ्यांच्या मधे गोळी मारून ठार केले. पण ही क्रिया करायला त्यांना तीन तासांहून अधिक कालावधी लागला. जिम कार्बेट यांनी कितीही चपळाईने खांद्यावरची बंदूक काढून वाघाला मारण्याचा प्रयत्न केला असता तरी त्या वाघाने त्यांना तेवढासुद्धा वेळ दिला नसता. जिम कार्बेट यांना पक्के माहीत होते की वाघाची दृष्टी ही दिवसा सामान्य असते तर रात्रीच्या अंधारात ती सहा पट चांगली असते. याशिवाय वाघाचा मेंदू व तात्पुरती स्मृती यांचा ताळमेळ इतका चांगला नाही. वाघाला अगदी संथ गतीने केलेली हलचाल ही लक्षात येत नाही हे जिम कार्बेट यांना माहिती होते. संथ हालचाल करण्याचा निर्णय हा केवळ एका सेकंदापेक्षाही कमी कालावधीत जिम कार्बेट यांनी घेतला होता. पण हेच जर त्यांना वाघाविषयी माहिती नसती तर वाघानेच त्यांना खाल्ले असते.
आपण आपल्याकडे माहिती-ज्ञान मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, सतत वाढवत राहिले पाहिजे, यामुळे आपली विचार करण्याची गती जरी संथ असली तरी आपण जो विचार करू तो जास्तीत जास्त अचूकतेकडे जात असतो. तसेच निर्णय घेणे अधिक सोपे होऊ शकते.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून मन एकाग्र ठेवून, फक्त आपल्या ध्येयासंबंधीच विचार करावा व तेच विचार पुष्प आपल्या मनोदेवतेच्या चरणी अर्पण करावे. अशा प्रकारे विचार केला म्हणजे आपण आपल्यातली सर्व ऊर्जा फक्त आपल्या समोर असलेल्या समस्येवर, ध्येयावर केंद्रित केली म्हणजे विचारचक्र योग्य गतीने फिरू लागतात आणि आपण अधिक चांगली कामगिरी करू शकतो. हाच आपल्या मनोदेवतेकडून आपल्याला मिळालेला प्रसाद असतो.
अनिकेत भालेराव