आपल्या मनातील नकारात्मक विचारांची जळमटे झटकून टाकून आत असलेल्या सकारात्मक विचारांना बाहेर काढून मनाचा मनोपालट कसा करावा याविषयी थोडेसे…
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार येतच असतात. आपण जे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवलेले असते ते कसे साध्य करावयाचे किंवा आयुष्यात पुढे काय करावयाचे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात, तर याच संबंधी आपले मन सतत विचार करीत असते. कामाबाबत आपल्याला काही नवीन माहिती मिळाली की त्या माहिती आधारे आपण आपले कामाचे नियोजन सुरू करतो.
अशी अनेक विचार चक्रे मनात एकाच वेळी फिरत असतात. पण याचबरोबर आपण जेव्हा मुश्किल काम सुरू करतो किंवा सुरू करावयाचे असते त्यावेळी आपल्या मनात कुठेतरी शंका निर्माण झालेली असते ती म्हणजे “मला हे जमेल का?’ हाच तो क्षण जेव्हा आपल्या मनात काही शंका उपस्थित होईल त्यावेळी आपल्या मनाला आपण नकारात्मक दिशेने जाऊ द्यावयाचे नाही. अशा वेळी हेतुतः पुन्हा दुसरा विचार मनात आणायचा तो म्हणजे, “जमेल’ पण “नाही जमले तर?’ हा प्रश्न जरी मनात आला तरी त्यावर विचार करणे सोडून द्यायचे व कसे जमू शकते यावरच जास्त विचार करावयाचा.
आपले लक्ष्य हे मोठे पण आपल्या आवाक्यातलेच असायला हवे. आपण आपले जीवन आपल्या उणिवा, कमजोरी, मर्यादा यासह जगायला शिकायला हवे. आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत, कोणी “पुरुषोत्तम’ नाही हे लक्षात घ्यायला हवे.
आपण नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा द्यावयाचा नाही. यासाठी आपणच आपल्यावर लक्ष ठेवायला हवे. जर आपण काही नकारात्मक विचार करायला लागू त्यावेळी थोडा काही बदल मुद्दाम घडवून आणावा. जसे आपण आपल्या खुर्चीवर बसून आहोत आणि नकारात्म विचार जोर पकडायला लागले तर खुर्चीवरून उठावे आणि खिडकीत यावे व बाहेरचे दृश्य बघावे. एक पेलाभर थंड पाणी प्यावे. आपण जे बघतो त्यावर विचार सुरू करतो. खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसेल त्यावर क्षणभर तरी विचार मनात येऊन जातो. हाच विचार आपल्या मनात असलेल्या नकारात्मक विचाराची जागा घेऊन टाकतो. अशा वेळी जर आपण पाणी पिले तर तृष्णा पूर्तीचा आनंदही मिळतो, मनाला तरतरी येते.
आपल्या विचारांत गढून गेलेलो असल्याने आपल्याला पाणी पिऊन बराच वेळ झालेला असतो. आपल्याला तहान लागलेली आहे याची जाणीव डोक्यातल्या विचारांमुळे काहीशी मागे पडलेली असते. त्यामुळे पाणी पिले तरी आपल्याला उभारी आल्यासारखे वाटते. तेवढे पुरेसे आहे, पुन्हा खुर्चीत बसून नव्या उत्साहाने कामाला आणि विचारांना सुरुवात केली, तर नकारात्मक विचार मनात येणार नाहीत. जेथे खूप धूर असेल तेथे आपल्याला श्वास घेणे मुश्किल होते, आपण तेथून दूर निघून जातो. त्याचप्रमाणे आपल्या मनातील नकारात्मक विचार म्हणजेच आपल्या विचारांचे प्रदूषण आहे. हे विचार प्रदूषण आपल्याला हटवायचे आहे.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे “सगळे काही अनुकूल घडले आणि प्रतिकूल काहीच घडणार नाही’ असा विचार करणे नव्हे. एखादे काम करत असताना ते सुरू करण्यापूर्वी त्यात काय संभाव्य अडचणी येऊ शकतात त्या विचारात घेऊन त्यांचे निराकरण आधीच करणे किंवा जेव्हा अडचण समोर येईल तेव्हा ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तरतूद करून ठेवणे. असे जर विचारपूर्वक नियोजन आधीच करून ठेवले तर आपण योजिलेले काम व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो. याचाच अर्थ असा की, नकारात्मक घटकांचाही विचार करून ते दूर कसे करता येतील याची तरतूद करून ठेवणे म्हणजेच सकारात्मकता. अशा काही प्रयत्नांमुळे व कार्यपद्धतीमुळेही आपण नकारात्मक परिस्थिती निर्माणच होऊ दिली नाही तर नकारात्मक विचार मनात येतील कसे?
सकारात्मक विचार करता करता आपण एक टप्प्यावर आत्मविश्वासाचा टप्पा गाठतो. आपल्याला आत्मविश्वास हवा आहे. आपण त्याच टप्प्यावर असणे आवश्यक आहे. पण त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे “अतिआत्मविश्वास’ हा असतो. त्या टप्प्यात आपल्याला कधीच जायचे नाही. आपल्या जवळ जे ज्ञान असते त्याच्यापुढेही आणखी काही ज्ञान आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या अपुऱ्या ज्ञानावर काही निर्णय घ्यावयाचा की पूर्ण माहिती-ज्ञान मिळवून निर्णय घ्यावयाचा हे वेळीच लक्षात आले पाहिजे.
आपण कायम आत्मविश्वासाच्याच टप्प्यावर ठेवायचे आहे. याशिवाय आपण अशा काही परिस्थितीत असतो की कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही. अशा वेळी मन शांत करण्यासाठी जर एखादे वाद्य वाजविता येत असेल तर ते वाजवावे किंवा आपल्या आवडीचे संगीत ऐकावे. काही गाणीसुद्धा प्रेरणादायक असतात. मशाल (1984) या चित्रपटातील “जिंदगी आ रहा हूँ में’ किंवा कुंकू (1937) या चित्रपटातील “मन सुद्ध तुझे गोस्त आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची’ अशी गाणे अतिशय सकारात्मक दृष्टिकोन देऊन जातात. अशा काही गाण्यांमधूनही आपल्याला प्रेरणा मिळते.
आपण मानसिक तणावात असताना नकारार्थी विचार करणाऱ्या किंवा कायम दुःखीकष्टी असणाऱ्या लोकांच्या संपर्कातच यावयाचे नाही. काही महत्त्वाचे निर्णय घेताना नकारात्मक विचार जर मनात येत असतील तर अशा वेळी तो निर्णय घेणे आपण थोडे लांबणीवर टाकावे. दुसऱ्या दिवशी सकाळी निर्णय घेण्याचे ठरवावे. पण त्याआधी रात्री त्या प्रश्नाबाबत काहीच विचार न करता शांत व गाढ झोप कशी घेता येईल हे पाहावे. आपल्यावर असलेल्या मानसिक ताणामुळे आपला मेंदू थकून गेलेला असतो. अशावेळी एक चांगली झोप झाली की मेंदू व मन ताजेतवाने होते. अशा वेळी शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा. निश्चित तो एक चांगला निर्णय ठरू शकतो.
वास्तविक पाहता आपण जितके स्वतःला ओळखत असतो तेवढे इतर कोणीच आपल्याला ओळखत नाही. म्हणूनच आपल्या मनात नकारात्मक विचार कसे येऊ द्यावयाचे नाहीत हे आपल्यालाच चांगले माहीत असते. आपण आपल्या मनोदेवतेच्या गाभाऱ्यात बसून “आपण आपल्या मनातून नकारात्मक झटकून टाकावयाचे आहेत’ अशा विचारांचे पुष्प जर आपल्या मनो देवतेला अर्पण केले, तर आपले जीवन हे सुखी समाधानी होईल, यात शंका नाही.
– अनिकेत भालेराव