ही माणसं खूप यशस्वी झालेली आहेत; पण त्यांनी शिक्षण घेतलेलंच नाही किंवा अर्धशिक्षित आहेत. मग प्रश्न असा पडतो की, यशाचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?
याआधी यश म्हणजे नक्की काय हे पाहावं लागेल. यश म्हणजे केवळ शैक्षणिक यश नव्हे. अतिश्रीमंत व्यक्तींपैकी विख्यात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, फेसबुकचे झुकरबर्ग आणि गुगलचे लॅरी पेज या सर्व संस्थापकांनी आपलं कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून आपापल्या व्यवसायांची मुहूर्तमेढ रोवली आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. भारतातही ओयो या यशस्वी स्टार्टअपचे संस्थापक रितेश आगरवाल, प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी कॉलेज शिक्षण सोडून दिलं आणि व्यवसायाला सुरुवात केली.
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे केमिकल इंजिनियर असले तरी अमेरिकन विद्यापीठात व्यवस्थापनाचं शिक्षण त्यांनीही सोडून दिलं. त्यांचे वडील धीरूभाई यांनी शाळेनंतर शिक्षण सोडलं. विप्रो कंपनीला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवणारे अझीम प्रेमजींनीदेखील अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून व्यवसायात लक्ष घालावयास सुरुवात केली. झी एंटरटेन्मेंट आणि एस्सेल या कंपन्यांचे संस्थापक सुभाष चंद्र यांनी शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडलं.
आता ही सगळी मंडळी यशस्वी झाली म्हणजे नेमकं काय झालं? हे सर्व खूप श्रीमंत-म्हणजे अतिधनाढ्य नक्कीच आहेत. पण हे त्यांचं यश आहे का? बारकाईनं विचार केला तर असं लक्षात येईल की त्यांचं यश हे त्यांनी निर्माण केलेले नवीन व्यवसाय की ज्यायोगे नुसता लाखोंना रोजगार मिळाला नाही तर जागतिक उद्योगाला नवी दिशा मिळाली. या वाटचालीत त्यांनी केलेलं धाडस, पत्करलेली जोखीम हेच त्यांचं खरं यश आहे.
सर्व खंडांत व्यवसाय असलेली व्हर्जिन विमानसेवा आणि व्हर्जिन समूह की ज्यामध्ये अंतरिक्ष-प्रवासाची कंपनीही आहे. याचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांची कथा अद्भुत आहे. शाळेमध्ये “ढ’चा शिक्का बसलेले ब्रॅन्सन यांनी शाळा सोडली. विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक चालवलं आणि विमानसेवेचा कणभरही अनुभव नसताना विमान कंपनीचा पाया घातला. आज व्हर्जिन विमानसेवा ही जगातील एक प्रमुख एअरलाइन आहे! अब्राहम लिंकन हे गुलामगिरी नष्ट करणारे थोर अमेरिकन राष्ट्रपती. खेडेगावात जन्मलेले लिंकन हे कधीच शाळेत गेले नाहीत. पण घरीच पुस्तकांचा अभ्यास करून चक्क वकील झाले आणि निवडणुका जिंकून नेतेही झाले.
आघाडीच्या नेत्या स्मृती इराणी यांनाही शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. प्रसिद्ध तारका आणि “मिस वर्ल्ड’ ऐश्वर्या राय हिनं शिक्षण अर्धवट सोडून मॉडेलिंग सुरू केलं. एवढंच काय जगातील सर्वात बुद्धिमान गणले गेलेले आणि आधुनिक भौतिकाचा पाया घातलेले आल्बर्ट आइन्स्टाइन हे शाळेत गणितात चक्क नापास होत असत. “भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटसाठी शिक्षणाला रामराम ठोकला.
खरंच शिक्षणाची यशस्वी होण्यासाठी आवश्यकता आहे का? याचं उत्तर “हो’ आणि “नाही’ असं आहे. शिक्षण सोडलेल्यांनी पारंपरिक शिक्षणाचा त्याग केला असेलही; पण त्यांनी व्यावहारिक किंवा प्रत्यक्ष शिक्षण आपल्या आवडीच्या व्यवसायात, खेळात किंवा कलेत झोकून देऊन घेतलेलं आहे. त्याशिवाय ते आपापल्या क्षेत्रात उच्चतम पातळी गाठूच शकले नसते. आपण शिक्षण याचा सोयीस्कर अर्थ शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन केलेला अभ्यास असा लावतो. परंतु जीवनाच्या संघर्षमय लढ्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मिळालेलं ज्ञान हेदेखील शिक्षणच आहे आणि हे शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे.
एका विनोदात शेतकी महाविद्यालयात शिकून आलेला मुलगा आपल्या अशिक्षित शेतकरी बापाला म्हणतो, “बाबा, या रोपाला जर वांगी लागली तर आश्चर्यच म्हणावं लागेल!’ बाप हसून म्हणतो, ‘खरंच आहे. मलादेखील आश्चर्यच वाटेल कारण हे टोमॅटोचं रोप आहे’. यातला विनोद सोडला तरी प्रत्यक्ष शिक्षणाचं महत्त्व इथे सांगितलं आहे.
अर्थात सामान्य शिक्षणालाही महत्त्व आहेच. कदाचित यशस्वी अर्धशिक्षितांना त्यांच्या आवडीचं पारंपरिक पद्धतीचं शिक्षण मिळालं असतं तर ते अधिक यशस्वी झाले असते, असं मला वाटतं. पारंपरिक शिक्षण घेऊन त्यात मोठा बदल घडवून आणणाऱ्या डिसले गुरुजींचं उदाहरण खूप बोलकं आहे!
– श्रीनिवास शारंगपाणी