होय, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलं आहे- ते प्लॅस्टिकमुक्त निसर्ग नसून प्लॅस्टिकयुक्त निसर्ग असंच आहे. आपलं शरीर 70 टक्के पाण्यानं बनलेलं आहे, असं सांगितलं जातं. तेही खरं आहे, पण आपल्या शरीरातील उती (टिश्यू) याही प्लॅस्टिकच्या आहेत, असं कुणी सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसेल काय? बहुधा नाही, पण ते खरं आहे. आपलं शरीरच काय, पण सृष्टीतील सजीवांच्या रचनेत प्लॅस्टिकचा मोठा भाग आहे.
मुळात प्लॅस्टिक म्हणजे काय? प्लॅस्टिक म्हणजे सेंद्रीय (ऑरगॅनिक) बहुवारिकांपासून (पॉलिमर) बनलेला पदार्थ होय. म्हणजेच त्यातील मुख्य घटक हा बहुवारिक-अर्थात् सेंद्रीय अणूंची पुनरावृत्त शृंखला-हा होय. जरी आपल्या शरीरातील उती पेशींपासून बनल्या असल्या तरी त्यामध्ये प्रथिन बहुवारिकांचा समावेश असतो. आपली त्वचा, नखं, केस हे प्रथिन बहुवारिकांचेच नमुने आहेत. केस जळल्यानंतर जो वास येतो तसाच वास नायलॉन हे प्लॅस्टिक जळल्यानंतर येतो हे निरीक्षण कदाचित तुम्ही नोंदवलं असेल. दोन्ही पदार्थांत नक्कीच साम्य आहे. मानवनिर्मित प्लॅस्टिक आणि या उतींमधलं नैसर्गिक प्लॅस्टिक यामधला नेमका फरक हा की मानवनिर्मित प्लॅस्टिक हे बव्हंशी खनिज तेलापासून (पेट्रोलियम) निर्मिलेल्या पदार्थांपासून कृत्रिमरीत्या बनवलं जातं तर नैसर्गिक प्लॅस्टिक सजीव निर्माण करतात. मानवनिर्मित प्लॅस्टिक सृष्टीमध्ये शोषलं जायला किंवा विरून जायला शेकडो वर्षे लागत असल्यानं सजीवनिर्मित प्लॅस्टिक बनवण्याकडे अलीकडील शास्त्रज्ञांचा कल दिसून येत आहे.
चलन-वलन करणाऱ्या सजीवांमध्ये प्रथिनयुक्त बहुवारिक असतात, तर वनस्पतींमध्ये कोशाधू (सेल्युलोज) हा घटक प्रामुख्यानं आढळतो. वनस्पतीतील पानं, लाकूड, फळांची सालं, मुळं एवढंच काय कापूस हे सर्व घटक सेल्युलोजपासून बनलेले आहेत. सेल्युलोज हे बहुवारिक शर्करेच्या (ग्लुकोज) पुनरावृत्त शृंखलेपासून बनलेलं आहे. जनावरं गवत पचवू शकतात, पण मनुष्य गवत पचवू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे. पण त्याचं कारण असं की जनावरांच्या तोंडात उपयुक्त जंतू असतात. गवताचं चर्वण करून जनावरं रवंथ करतात तेव्हा या जंतूंच्या मदतीनं गवत म्हणजे सेल्युलोजच्या शृंखला छिन्नविच्छिन्न होऊन त्यातील शर्करा वेगळी होते. ही पचायला सोपी असते आणि जनावरांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा देते. मनुष्याच्या तोंडात तसे उपयुक्त जंतू नसतात (शिवाय आपण रवंथही करत नाही!) त्यामुळे आपण गवत पचवू शकत नाही. रेयॉन या मानवनिर्मित तंतूबद्दल ऐकलं असेल. रेयॉन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुनर्निर्मित सेल्युलोजच आहे. सुती कपड्याशी तुलना करता त्याचे काही फायदे आहेत म्हणून त्याचं उत्पादन केलं जातं.
कीटकांमध्ये पण नैसर्गिक प्लॅस्टिक असतं. अनेक कीटकांचा पृष्ठभाग अतिशय कठीण कवचाचा बनलेला असतो. त्या निसर्गनिर्मित प्लॅस्टिकला चिटिन असं नाव आहे. अशी कठीण पाठ असलेले कीटक फरशीवर पडले असता “टक’ असा आवाज झालेला अनेकांनी ऐकला असेल. असे बहुउपयोगी चिटीन निर्माण करून ते वापरात आणण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. कोळी निर्माण करत असलेला धागा त्याच्या असामान्य गुणधर्मामुळे महत्त्वाचा ठरतो. वजन आणि शक्ती यांचा विचार केल्यास कोळ्याचा धागा हा पोलादापेक्षाही अधिक बळकट आहे असं सिद्ध झालं आहे. त्यामुळे “तंतुनाभ रेशीम’ (स्पायडर सिल्क) कृत्रिमरीत्या निर्माण करण्याबद्दल संशोधन चालू आहे. चिटीन आणि स्पायडर सिल्कपासून वजनानं खूप हलकं चिलखत तसंच बुलेटप्रूफ जॅकेट बनवता येईल असं शास्त्रज्ञांना वाटतं.
निसर्गनिर्मित प्लॅस्टिक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनी अतिशय उपयुक्त आहे यात शंका नाही. अशा प्लॅस्टिकवर अधिकाधिक संशोधन होऊन ते उपयोगात आणणं गरजेचं झालं आहे. याचं कारण म्हणजे कृत्रिम किंवा मानवनिर्मित प्लॅस्टिक हे पर्यावरणाला अतिशय धोकादायक आहे. नैसर्गिक प्लॅस्टिकपासून मात्र सृष्टीला असा कोणताही धोका नाही. सद्य परिस्थितीत नैसर्गिक प्लॅस्टिक उत्पादन हा खूप महाग पर्याय आहे, असं दिसून येतं.
मात्र, प्लॅस्टिकला सरसकट वाळीत टाकण्यापूर्वी आपणही प्लॅस्टिकचेच बनलो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे आणि अर्थातच जीव-प्रकोशांचा-म्हणजे बायोप्लॅस्टिकचा पुरस्कार केला पाहिजे, पण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची गरज आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी