मुलांनो, रामायण आणि महाभारत ही आपली दोन महत्त्वाची महाकाव्ये आहेत. त्यात अनेक लहानमोठ्या गोष्टी आहेत. महाभारतातील कौरव पांडव तुम्हाला माहीत असतील. पांडवांची पाच नावं माहीत आहेत? सगळ्यात मोठा युधिष्ठिर. तो धर्माच्या विरुद्ध कधीही वागायचा नाही. धर्म म्हणजे हिंदू किंवा मुस्लीम नव्हे; आपला आपद्धर्म. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांचा धर्म अभ्यास करणं हा आहे. डॉक्टरांचा धर्म रोग्याला बरं करणं हा असतो. तर तसा युधिष्ठिर जे त्याचं कर्तव्य असेल, जबाबदारी असेल ते निष्ठेने पार पाडत असे. धर्माचरण करण्यास कधीही चुकत नसे. म्हणून त्याला धर्मराज असंही म्हटलं जातं. त्यानंतर भीम हा अत्यंत ताकदवान व गदायुद्धात प्रवीण होता. अर्जुन धनुर्विद्येत निष्णात होता. नकुल हा चौथा पांडव. तो अत्यंत देखणा होता. खङ्गयुद्धात त्यानं फार मोठं कौशल्य प्राप्त केलं होतं. पाचवा सहदेव. हा अश्वविद्येत पारंगत होता. म्हणजे घोड्यांविषयीचं सर्व ज्ञान त्याला होतं. असे हे पाच बुद्धिमान पांडव होते.
एकदा काय झालं, कौरव आणि पांडव लहान असताना विटीदांडूचा खेळ खेळत होते. अचानक त्यांची विटी उंच उडते आणि एका विहिरीत जाऊन पडते. आता ती इतकी खोलात पडलेली विटी कोण काढून देईल असा विचार करत ते आजूबाजूला पाहू लागले. तर तिथे एक ऋषी एका झाडाखाली बसून साधना करीत होते. मुलं त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, “आमची विहिरीत पडलेली विटी तुम्ही आम्हाला काढून द्याल का?’ धनुष्यबाण घेऊन ते ऋषी त्यांच्याबरोबर विहिरीजवळ येतात. विटी नेमकी कुठे आहे, त्याचा वेध घेतात आणि बाण मारून त्या बाणावर विटी तोलून धरतात. दुर्योधन म्हणतो, “ही विटी वर कशी आणणार?’ ते त्या बाणाच्या खाली आणखी एक बाण उभा करतात. त्याच्याखाली एक बाण… असे करत सर्वात वरच्या बाणावर असलेली विटी वरपर्यंत येते. विटी परत मिळाल्यावर मुलं खूश होतात.
अर्जुनाला या कौशल्याचं मोठं नवल वाटतं. तो त्याच्या आजोबांना म्हणजे भीष्मांना ही हकिकत सांगतो. ते म्हणतात, “अरे, हा कोणी साधासुधा माणूस नसणार. चल, आपण त्यांना भेटू यात.’ अर्जुन त्यांना घेऊन त्या ऋषींकडे येतो. तर ते कोण असतात? द्रोणऋषी. भीष्मराज द्रोणऋषींना मोठ्या सन्मानाने राजवाड्यावर घेऊन येतात व त्यांना विनंती करतात की, कौरव व पांडव यांना त्यांनी धनुर्विद्या शिकवावी. तेव्हापासून द्रोण या मुलांचे गुरू झाले. अर्जुनाने द्रोणांकडून भराभर धनुर्विद्या संपादन करून घेतली. दुर्योधन म्हणे, “गुरुजी, अर्जुन तुमचा फार लाडका आहे. म्हणून त्याला तुम्ही जास्त शिकवता आमच्यापेक्षा.’
द्रोण म्हणतात, “आता उद्या आपण उपवनात जाऊ या. तिथे आपण अभ्यास करू.’ दुसऱ्या दिवशी सर्व मुलं बागेत जातात. तिथे झाडावर एक कापडी पोपट टांगलेला असतो. तो वाऱ्याने हलत असतो. गुरुजी म्हणतात, “या पोपटाच्या बरोब्बर डोळ्यावर तुम्हाला बाण मारता आला पाहिजे. बघू कुणाला येतो ते.’ सर्वजण प्रयत्न करतात. कुणाचा बाण फांदीला लागतो, तर कुणाचा पोपटाच्या पंखाला वगैरे बाण लागतो. मग ते अर्जुनाला सांगतात. तो शांतपणे धनुष्याला बाण लावतो. त्याचा बाण सुटतो व तो बरोब्बर पोपटाच्या डोळ्याला लागतो. द्रोण म्हणतात, “आता तुम्ही प्रत्येकाने मला सांगा की, जेव्हा तुम्ही नेम धरला, तेव्हा तुम्हाला समोर काय दिसत होतं?’ कोणी म्हणतं, मला झाडावरचा आंबा दिसला.
कोणी म्हणतं, मला पोपटाचा हिरवागार रंग दिसत होता. जेव्हा ते अर्जुनाला विचारतात, तेव्हा तो म्हणतो, “तुम्ही आम्हाला पोपटाच्या डोळ्यावर बाण मारायला सांगितला होतात ना? मला फक्त तोच डोळा दिसत होता. बाकी मला काहीही दिसलं नाही.’
द्रोण मुलांना म्हणतात, “बघितलंत? अर्जुनाचं फक्त त्या पोपटाच्या डोळ्याकडे लक्ष होतं. बाकी त्याचं कशाहीकडे लक्ष नव्हतं. तो धनुर्विद्येत का पारंगत आहे हे कळलं आता? मी तुम्हा सर्वांचा गुरू आहे. तुम्हा सर्वांना मी सारखंच शिकवतो. पण गुरू शिकवतो, तेव्हा विद्यार्थ्यांचीही जबाबदारी असते. मी जे ज्ञान देतो, त्यातलं तुम्ही किती ग्रहण करता, यावर तुमचं यश अवलंबून आहे.’
मुलांनो, द्रोणगुरुजी तर खरंच सांगत होते, होय ना? तुमचे शिक्षक जेव्हा तुम्हाला शिकवतात, तेव्हा सगळ्या मुलांसमोर उभे राहून ते सगळ्यांना सारखं शिकवत असतात. पण त्यातल्या काही मुलांना विषय खूप चांगल्या पद्धतीनं कळतो. त्यांना त्या विषयात मार्क चांगले पडतात. का बरं? कारण शिकत असताना त्यांचं सारं लक्ष फक्त तो विषय शिकून घेण्यावर असतं. मिळत असलेलं ज्ञान एकाग्रचित्त करून ते नीट ग्रहण करतात. अर्जुन सर्वोत्तम शिष्य होता. तुम्ही कशा प्रकारचे शिष्य होणार? पहा… तुम्हीच ठरवा.
– माधुरी तळवलकर