प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -खडकवासला धरणसाखळीतून गेल्या पाच दिवसांत तब्बल पाच टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. तर, यंदाच्या हंगामात मागील अडीच महिन्यांत तब्बल 20.22 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे. दरम्यान, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातून सुरू असलेला 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करून तो 5 हजार 138 करण्यात आला होता.
शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत रविवारपासून (दि.11) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर हा पाऊस सुरूच असल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरू करण्यात आले होते. मागच्या आठवड्यापर्यंत सुमारे 15.52 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सलग चार दिवस पाणलोट क्षेत्रात झाला. तर शुक्रवारी दिवसभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिणामी, धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने खडकवासला धरणातून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 30 हजार 677 क्युसेक विसर्ग करण्यात आला. मात्र, शुक्रवारी रात्रीनंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मध्यरात्रीपासूनच विसर्ग कमी करण्यात आला असून, शनिवारी सायंकाळी तो 5 हजार 138 क्युसेक होता. मात्र, सायंकाळी साडेसहानंतर पाणलोट क्षेत्रात अचानक मुसळाधार पाऊस सुरू झाल्याने सात वाजता हा विसर्ग 8 हजार 132 क्युसेक विसर्ग करण्यात आले. तर वरून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास विसर्ग 18 ते 20 हजारांपर्यंत वाढवणार असल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.
उच्चांकी विसर्ग
शुक्रवारी धरणातून सोडण्यात आलेले पाणी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विसर्ग होता. गेल्या पाच वर्षांत 2019 मध्ये खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतरचा हा सर्वाधिक विसर्ग आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 18 हजार 419 क्युसेक, 2020 मध्ये 16 हजार 247 क्युसेक, 2021 मध्ये 25 हजार 036 क्युसेक, तर या वर्षी हा 30 हजार 677 क्युसेक होता. या चारही धरणांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे.