माझ्या माहितीतल्या एक बाई सतत स्वतःला कोसत असतात. “माझंच मेलीचं चुकलं, मी असं करायला नको होतं’ असं त्या वारंवार म्हणत असतात. हाच अपराधभाव. इंग्रजीत याला “गिल्ट कॉंप्लेक्स’ असे म्हणतात. अशी माणसं नैराश्याला बळी पडू शकतात. मनुष्य एखाद्या परिस्थितीत जो निर्णय घेतो किंवा वागतो त्याच्या मुळाशी अनेक कारणं असतात. खूप खोलवर विचार करून निर्णय घेतला नाही तर बव्हंशी अशी अस्थिर मनोवृत्तीची व्यक्ती अपराधभावाला बळी पडते. अपराधभाव असलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या दुर्बल असते.
अपराधभावाची अनेक लक्षणं असतात. चिंताग्रस्तता, वारंवार रडत बसणे, निद्रानाश, खिन्नता, स्नायूंवर आलेला ताण एवढंच काय पण बिघडलेलं पोटही अपराधभावाला जन्म देऊ शकतं. जेव्हा मनोदुर्बल माणूस इच्छेनुसार घडत नसल्यानं चिंताग्रस्त होतो तेव्हा तो मनात कारणमीमांसा करू लागतो. जेव्हा कुठलंच कारण सापडत नाही तेव्हा तो स्वतःला दोष देऊ लागतो आणि अपराधभाव मनात दृढ होऊ लागतो.
माझ्यापेक्षा लहान असलेला एक मित्र/सहकारी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. त्याचा पत्ता विचारायला मी त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या आईनं हंबरडाच फोडला. मला काही कळेना. त्याचे वडील सांगू लागले की मुलगा परदेशी गेल्यापासून ही (मुलाची आई) असंच करत आहे. मी त्या माउलीला म्हटलं की तुमचा मुलगा उच्च शिक्षण घ्यायला तिकडे गेला आहे तर तुम्ही तर आनंद व्यक्त करायला हवा. त्यावर त्या म्हणाल्या की “मी आता माझ्या मुलाला माझ्या हातचे पोहे, शिरा खाऊ घालू शकणार नाही.’ त्या साध्याभोळ्या माऊलीचं उत्तर ऐकून हसावं का रडावं तेच मला कळेना. केवळ आपण घरचं खायला देऊ शकणार नाही या अपराधभावनेनं त्या रडत होत्या. शेवटी मी त्यांची समजूत घातली की तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका कारण तो मजेत तिकडे पिझ्झा, बर्गर खात असेल.
असेच एक वृद्ध गृहस्थ खिन्न होऊन बसले होते. त्यांचाही मुलगा परदेशात स्थायिक झाला होता. “आता तो आमची काळजी घ्यायला कुठला येतोय्. आमचंच चुकलं. आम्ही त्याच्यावर चांगले संस्कार करू शकलो नाही’ असं काहीसं ते बडबडत होते. ही आपण चुकल्याची भावना अपराधभाव निर्माण करते. तो परदेशी गेला तेव्हा तुम्हीच त्याला आशीर्वाद देऊन यशस्वी हो असं म्हणाला होतात ना? त्या आशीर्वादानंच तो यशस्वी होतोय. मग हा चांगल्या संस्कारांचाच परिणाम नाही का? त्यांचा गिल्ट कॉंप्लेक्स किती कमी झाला ते कळलं नाही पण तेवढ्यापुरतं तरी त्यांना बरं वाटलेलं दिसलं.
लहानपणी अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्ती अपराधभावाचं भक्ष्य होतात. आपल्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे किंवा आपण चुकीचा मार्ग स्वीकारल्यामुळे (उदाहरणार्थ, खोट्या प्रेमाला/आकर्षणाला बळी पडल्यामुळे) आपल्यावर अत्याचार झाल्याची त्यांची समजूत होते. बराचसा कालावधी लोटल्यावर केलेल्या पापाचा काहींना पश्चात्ताप होतो. अशा बाबतीत बहुधा अपराधभाव हेच कारण असतं. पुण्यामध्ये काही दशकांपूर्वी झालेल्या हत्या-मालिकेमधील सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. त्यातील एक-दोघे निर्ढावलेले असल्याने निमूटपणे फासावर गेले पण एकाच्या मनात अपराधभाव दाटून आल्यानं तो विनवणी करू लागला, रडू लागला. अर्थात् त्याचा काही उपयोग झाला नाही हे गोष्ट वेगळी. पूर्व अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी लहानपणी भेट मिळालेल्या कुऱ्हाडीचा वापर बागेतील झाडावर केला. नंतर अपराधभावानं व्यथित होऊन त्यांनी वडिलांकडे आपली चूक कबूल केली. कित्येक पालकांना आपल्या पाल्यांचं संगोपन नीट न केल्यामुळे ती वाईट मार्गाला (विशेषतः ड्रग्जच्या नादी) लागली अशा अपराधभावाला सामोरं जावं लागतं.
मानसोपचारतज्ज्ञ अपराधभावावर उपचार करू शकतात. काही वेळा अवसादरोधी (अँटिडिप्रेसंट) औषधांचा उपयोग केला जातो तर संज्ञानी वर्तनीय उपचार (कॉग्निटिव्ह बिहेविओरल थेरपी-सीबीटी) हेही वापरले जातात. या मानसोपचारात चुकीचे किंवा भ्रामक विचार ओळखून त्यांना योग्य दिशा दिली जाते. असे उपचार दीर्घ कालावधीचे असू शकतात. अर्थात् योग्य वागणूक ठेवून अपराधभाव न येऊ देणं हेच यथायोग्य.
– श्रीनिवास शारंगपाणी