पिंपरी – पवना नदीपात्रात ड्रेनेजद्वारे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. रावेत येथील अशुद्ध बंधा-यापर्यंत दूषित पाणी गेले आहे. शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. पवना नदीच्या दुर्दशेला महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत. शासनाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहून संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) पत्र दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पवना नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. पवना नदी प्रदूषित झाली आहे.
मासे मृत पावले. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने सातत्याने नदी फेसाळत आहे.. नदी सुधारसाठी मी अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. अनेक पर्यावरणप्रेमी संघटना त्याविरोधात आवाज उठवत आहेत, याला गांभिर्याने घेतले जात नाही, असेही बारणे यांनी पत्रात म्हटले आहे.
एसटीपी मालकांशी लागेबांधे
खासदार बारणे यांनी आरोप केला आहे की, पवना नदीच्या दुर्दशेला पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी हे पूर्णपणे जबाबदार आहेत. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मालक आणि कुलकर्णी यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ कुलकर्णी यांच्यावर कारवाई करावी. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. शासनाने कारवाई न केल्यास पवना नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कुलकर्णी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.