आठ वर्षांपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंग बादल हे होते. त्यावेळी, म्हणजे 2015 साली गुरु ग्रंथसाहिबची अवहेलना किंवा पावित्र्यभंग करण्याची घटना घडली होती. त्यानंतर धर्मनिंदेच्या अशा एकामागोमाग एक घटना घडल्या होत्या. या घटना थांबवण्यात आम्हाला अपयश आल्याबद्दल मी खेद व्यक्त करत आहे, असे उद्गार नुकतेच शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी काढले आहेत.
अमृतसर येथील सुवर्णमंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात ’लोकहो, आम्हाला माफ करा’ असे आवाहन सुखबीर यांनी केले, याला खूप महत्त्व आहे. सध्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. आज तेथे अकाली दलाला फारसे स्थान नाही. आपल्या पक्षाला पुन्हा यश मिळावे यासाठीच सुखबीर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे दिसते. अकाल तख्त साहिबच्या समोर उभे राहूनच सुखबीर यांनी गुरूंची तसेच शीख समाजाची माफी मागितली असून, पंजाबमध्ये समाजावर धर्माचा खूप पगडा आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ज्यावेळी पावित्र्यभंगाची ही घटना घडली, तेव्हा सुखबीरसिंग बादल हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. ज्यांनी ग्रंथसाहिबचा अपमान केला, त्या आरोपींवर सुखबीर यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.
अकाली सरकारने त्या घटनेच्या चौकशीची जबाबदारी सीबीआय कडे सुपूर्द केली होती. वास्तविक हे काम अकाली सरकारने स्वत:च करणे आवश्यक होते. परंतु काही संघटना आणि नेत्यांच्या दबावामुळे आपण त्या घटनांकडे दुर्लक्ष केले, असे सुखबीर यांनी कबूल केले आहे. ज्यावेळी पावित्र्यभंगाचे प्रकार घडले, तेव्हा राज्यभर शीख संघटनांनी निदर्शने केली. पोलीस गोळीबारात दोन जणांचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे तत्कालीन अकाली सरकारवर जनता नाराज झाली आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांत अकाली- भाजप आघाडीचा पराभव झाला. दहा वर्षांची अकाली दल- भाजपची सत्ता समाप्त झाली. त्यानंतर शिवसेनेप्रमाणे शिरोमणी अकाली दलाचे दोन तुकडे झाले आणि अकाली दल हा पक्ष म्हणून जवळपास वनवासातच गेला. 2022 च्या विधानसभा निवडणुकांत शिरोमणी अकाली दलास केवळ तीन जागांवर विजय मिळाला.
सुखबीर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर देखील त्यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी टीका केली आहे. ’चुकी’बद्दल दिलगिरी व्यक्त करता येते, परंतु ’गुन्हा’ घडला असल्यास, ’सॉरी’ म्हणून त्यावर पडदा टाकता येत नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक धर्मनिंदेच्या घटनेचे गांभीर्य तेव्हा अकाली दलाच्या लक्षातच आले नव्हते. त्या घटनेचे राज्यावर कोणते परिणाम होतील, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पण अकाली दलानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने व सध्याच्या आप सरकारने देखील संबंधित गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कोणतेही प्रयत्न केले नाहीत, हे वास्तव आहे.
सध्या शिरोमणी अकाली दलाची अवस्था अत्यंत बिकट आहे. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्यामुळे माझे वडील प्रकाशसिंग यांनी व मी स्वतः अन्याय केला आहे, असे वाटून ज्यांनी पक्ष सोडला आहे, त्यांनी परत पक्षात यावे, असे कळकळीचे आवाहन सुखबीर यांना करावे लागत आहे. खालसा पंथ अकालींच्या ध्वजाखाली एकत्र आला, तरच पंथाचे आणि राज्याचे जे शत्रू आहेत, त्यांच्याशी लढता येईल, असे प्रतिपादन सुखबीर यांनी केले आहे. मात्र सुखबीरसिंग बादल यांच्या माफीनाम्याला काहीएक अर्थ नाही. मुळात धर्मनिंदेच्या घटनेविरोधात रास्तपणे आंदोलन करणार्यांवर गोळीबार करण्याचा पोलिसांना आदेश कोणी दिला, हे सुखबीर यांनी सांगितले पाहिजे. तसेच डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्यांच्या अनुयायांना खुश करण्यासाठी म्हणूनच धर्मनिंदेच्या घटनेचा नीट तपास करण्यात आला नाही, असा आरोप पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग बाजवा यांनी केला आहे.
सध्या पंजाबात शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांची युती नाही. काही वर्षांपूर्वीच दोघांमधील युती मोडली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांत भाजपचा लक्षणीय विजय झाल्यामुळे सध्या भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अकाली दलाशी युती करायची असेल, तर आपल्याला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असा भाजपचा विचार असू शकतो. वादग्रस्त कृषी विधेयकांच्या प्रश्नांवरून 2020 मध्ये अकाली दलाने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले होते. 2022 च्या विधानसभा निवडणुका भाजपने स्वतंत्रपणे लढवल्या. केवळ काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या कॅप्टन अमरिंद सिंग यांच्याशीच भाजपने समझोता केला होता. 2017 साली भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. तर 2022 मध्ये फक्त दोन जागा जिंकता आल्या.
पंजाब विधानसभेचे एकूण संख्याबळ 117 इतके आहे. अकाली दल आणि भाजपची दोन दशकांपेक्षा अधिक काळ मैत्री होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकांत अकाली दलाने 94 जागा लढवल्या, तर भाजपच्या वाट्यास 23 जागा आल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकांत अकाली दलाने दहा जागा लढवल्या, तर भाजपने तीन. यावेळी जर अकाली दलाशी युती झाल्यास, भाजपला आठ जागा हव्या असून, अकालींना केवळ पाच जागा देण्याची भाजपची तयारी आहे. त्यामुळे भाजपशी युती करायची की नाही, या पेचात सध्या अकाली दल सापडले आहे!