ताटकळलेल्या नागरिकांची भेट घेत जाणून घेतल्या समस्या
मंचर – आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सहकारमंत्री झाले. वळसे पाटील हे त्यांच्या कामाने आणि अतिशय संयमी, अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आपली निवेदने घेऊन त्यांना भेटण्यासाठी पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आले होते. मात्र वळसे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
ही गोष्ट वळसे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः गर्दीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना वाट पाहायला लागल्याने त्यांची दिलगिरी देखील व्यक्त केली. वळसे पाटील यांच्या या कृतीने सर्वजण भारावून गेले होते.
सहकारमंत्री झाल्यानंतर वळसे पाटील हे पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यात आले होते. त्यांच्या भेटीसाठी अनेक नागरिक अतिगृहात थांबले होते. मात्र सर्वांच्या भेटीगाठी घेत त्यांना या आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी उशीर झाला. ही गोष्ट वळसे पाटील यांच्या लक्षात येताच ते स्वतः खुर्चीमधून उठून त्या नागरिकांच्या गर्दीत जाऊन उभे राहिले. यावेळी निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याचे आश्वासन देखील त्यांनी या नागरिकांना दिले, तर काहींच्या समस्या जागेवरच सोडविल्या.
वळसे पाटील यांच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली. एवढा मोठा नेता असूनही सर्वसामान्य नागरिकांबद्दल एवढी आपुलकी असल्याचे पाहून सर्वजण भारावून गेले होते.