भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ओबीसी मेळाव्याला उपस्थित रहा: पांडे
अकोले – सरकारने कुणबी समाजातील कुटुंबाचा सर्वेक्षण करताना जे प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्याच प्रश्नांवर जी उत्तरे अपेक्षित आहेत, त्याबद्दल सोशल मीडियावर जी प्रश्न व उत्तरे व्हायरल करण्यात आले, त्यावर मी वक्तव्य केले. मी महिला किंवा जातीधर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केलेले नाही. मी सर्व जातीधर्मातील लोकांचा व महिलांचा आदर करणारा आहे.
तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकेरी वक्तव्य केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या सर्व वक्तव्यावरून कोणाच्या भावना दुखावण्याचा व अनादर करण्याचा प्रयत्न मी केलेला नाही. अपशब्द वापरले नाहीत. यापुढील काळातही माझ्याकडून असे होणे शक्य नाही. तरी माझ्या वक्तव्याने जर मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, अशी दिलगिरी व्यक्त करुन शनिवारच्या नगर येथील ओबीसी मेळाव्यास मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते व अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी केले आहे.
मिनानाथ पांडे याच्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी काल मराठा समाजाची पत्रकार परिषद झाल्यानंतर आज मिनानाथ पांडे समर्थनार्थ व गैरसमज दूर करण्यासाठी तालुका ओबीसी संघटनेची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे हे वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत बोलत होते.
याप्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब मंडलिक, बाळासाहेब ताजणे, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा.बाळासाहेब मेहेत्र,अशोक गायकवाड, किसन बेनके, नितीन बेनके, शिवाजी गायकवाड,बाळासाहेब वाकचाैरे, नवनाथ गायकवाड,सचिन ताजणे, विष्णू कर्णिक,अशोक झोडगे, भाऊसाहेब मंडलिक, राजेंद्र उकिरडे आदी उपस्थित होते.
पांडे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आज अचानक उद्भवलेला नाही. मराठा आरक्षणावर अनेक मूकमोर्चे निघालेत. मराठा समाजात दारिद्य्राखालील अनेक कुटुंब आहेत. अकोले तालुक्यातून अनेक मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळवून देण्यात आम्हीही प्रशासकीय अधिकार्यांकडे आग्रह धरून ते मिळवून दिले आहेत. पण सरसकट सर्वांनाच ते देण्याचा वटहुकूम शासनाकडून काढण्यात आल्याची बाब ओबीसींवर अन्यायकारक आहे. बाराबलुतेदार लोकांपैकी अनेकांना शेती नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांचे त्यांचे व्यावसाय आहेत. त्यांना कोणी कमी समजू नये. अकोले तालुक्यातून ओबीसींचे लोक मोठ्या संख्येत नगर येथील तीन फेब्रुवारीच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहोत.
यावेळी किसन बेनके म्हणाले की, भुजबळ यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असून त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आमचा कानडी समाज ओबीसी आरक्षणाबाबत आहे. मराठा समाजाला ओबीसींतून न देता स्वतंत्र आरक्षण द्या, या मागण्यांवर आमचाही जाहीर पाठिंबा आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत सरकार काय निर्णय घ्यायचा ते घेईल पण आपापसात दुरावा किंवा तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणे उचित नाही. कोणीअरेरावीची भाषा करू नये व असे प्रकार चालू देणार नाही, असा इशारा दिला.