आज आपल्या देशात आणि महाराष्ट्रात दलितांच्या राजकारणाची स्थिती फारशी चांगली नाही, हे कोणीही मान्य करेल. यातही उत्तर प्रदेशचा विचार करता तेथे एकेकाळी दलित समाजाचे एकमुखी नेतृत्व करणारा श्रीमती मायावती (जन्मः 1956) यांचा बहुजन समाज पक्ष उतरणीला लागलेला दिसत आहे. अशा स्थितीत मागच्या आठवडयात बसपाबद्दल आलेल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले. मायावतींनी त्यांचा भाचा श्री. आकाश आनंद यांना बहुजन समाज पक्षाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. रविवारी दहा डिसेंबर रोजी लखनौ येथे भरलेल्या पक्षाच्या बैठकीत ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
आकाश हे मायावतींच्या धाकटया भावाचे पुत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील विधानसभा निवडणूका बसपाने आकाश यांच्या निरीक्षणाखाली लढवल्या होत्या. या राज्यांत बसपाला खास यश मिळाले नाही. बसपाला फक्त राजस्थानात दोन जागा जिंकता आल्या तर इतर राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही. राजस्थानातील मतदानाचे विश्लेषण केले तर लक्षात येते की 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणूकांत बसपाचे 6 उमेदवार निवडून आले होते आणि पक्षाला 4 टक्के मतं मिळाली होती. या खेपेला फक्त 1.8 टक्के मतं मिळाली आहेत. अशीच निराशजनक स्थिती मध्य प्रदेशमध्ये दिसून येते. 2018 साली बसपाचे दोन उमेदवार विजयी झाले होते आणि पक्षाला 5 टक्के मतं मिळाली होती. आता तर एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि 3 ट़क्के मतं मिळाली. छत्तीसगढमध्ये जवळपास अशीच स्थिती आहे. तेथे 2018 साली दोन जागा जिंकल्या होत्या आणि 3.9 टक्के मतं मिळाली होती. आता एकही जागा मिळाली नाही आणि मतं 2 टक्के. हे तपशील डोळयांसमोर ठेवले म्हणजे बसपाचे नवे नेते श्री. आकाश यांच्यासमोरचे आव्हान किती जबरदस्त आहे, याचा अंदाज येतो. आपल्या देशाची राजकीय संस्कृती समोर ठेवली तर लक्षात येते की आकाश आनंद (वय 28) यांच्यावर तरूण वयात मोठी जबाबदारी आली आहे.
आजच्या बसपाची ही अवस्था काय झाली आणि नवे नेते आकाश आनंद यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत, याची चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र त्याआधी बसपाचा -हास का झाला आणि केव्हा सुरू झाला, याची चर्चा करणे गरजेचे आहे.
भारतीय संघराज्यातील उत्तर प्रदेशात दलित समाजाची लोकसंख्या सुमारे 21 टक्के आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरूवातीच्या काळात तेथील दलित समाज महाराष्ट्रातील दलित समाजासारखा राजकीय क्षेत्रात जागृत नव्हता. महाराष्ट्रातील या किमयेचा जादुगार म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. उत्तर प्रदेशातील दलित समाजाचा मोठा नेता म्हणजे कै. बाबू जगजीवनराम. बाबुजींनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहून राजकारण केले. परिणामी तेथील दलित समाजाला संघर्षाची सवय नव्हती. या स्थितीत 1980 च्या दशकात बदल व्हायला लागला. या दशकांत कै. कांशीराम यांनी 1984 साली बहुजन समाज पक्ष स्थापन करून उत्तर प्रदेशातील दलितांना एका झेंडयाखाली आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. परिणामी 2007 साली उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकांत बसपाने स्वबळावर सत्ता काबिज केली. त्याआधीसुद्धा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या होत्या पण तेव्हा कोणत्या तरी पक्षाच्या पाठिंब्यावर. मात्र 2007 साली बसपाने 206 आमदार निवडून आणले होते.
मायावतींनी 206 आमदार निवडून आणले खरे पण त्यासाठी त्यांना बसपाच्या महत्वाच्या तत्वांना तिलांजली द्यावी लागली. बसपाने सुरूवातीची अनेक वर्षे उघडपणे सवर्ण समाजाविरूद्ध भूमिका घेतली होती. त्या काळी बसपाची घोषणा होती तिलक, तराजू और तलवार; मारो इनको जूते चारफ. यातून बसपाची सवर्णविरोधातील भूमिका ठळक होत होती. जेव्हा मायावतींच्या लक्षात आले की जर त्या फक्त दलितांचे राजकारण करत राहिल्या तर त्यांना राजकीय सत्ता मिळणार नाही. याचा पुरावा म्हणून 2002 साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांचे निकाल समोर ठेवावे लागतात. या निवडणूकांत बसपाला एकुण 405 जागांपैकी फक्त 98 जागा जिंकता आल्या होत्या तर मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाने 143 जागा जिंकल्या होत्या.
बसपासाठी 2007 साल महत्वाचे ठरले. 2002 सालचा अनुभव लक्षात घेऊन मायावतींनी या खेपेस सवर्णाशी आघाडी केली व बसपाची घोषणा बदलली. आता बसपा म्हणायला लागला हाथी नही, गणेश है; ब्रह्मा विष्णू महेश है. बसपाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे, हे लक्षात घेतले म्हणजे यातून काय व्यक्त होते हे लक्षात येईल. 2007 साली विधानसभा निवडणूकांत बसपाने अभूतपूर्व यश मिळाले पण त्याची जबरदस्त किंमत पक्षाला द्यावी लागली. एका पातळीवर पक्षाने दलित समाजाचा विश्वास घालवला. सत्तेसाठी मायावती कोणाशीही हातमिळवणी करू शकतात हा संदेश गेला.
मतदारांनी या प्रकारच्या तडजोडीच्या राजकारणाची शिक्षा बसपाला 2012 साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत दिली. 2007 साली 206 आमदार निवडून आणणाया बसपाला 2012 साली फक्त 80 जागांवर समाधान मानावे लागले. यापेक्षा मोठा धक्का पुढे बसायचा होता. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणूकांत उत्तर प्रदेशातून बसपाचा एकही खासदार निवडून आला नाही. तेव्हापासून उत्तर प्रदेशातील दलित समाजात अस्वस्थता आहे .आता तर तेथे भीम सेना या राजकीय शक्तीचा बोलबाला आहे. भीम सेनेचा उदय आणि विकास अपरिहार्य ठरतो. राजकीय पक्ष म्हणजे समान हितसंबंध असलेल्या लोकांचा समुह. उत्तर प्रदेशातील दलितांना जर असे वाटत असेल की आता बसपा त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करू शकत नाही तर तो समाज आपोआपच पर्याय शोधायला लागतो. आज हा पर्याय म्हणजे भीम सेना.
जेव्हा भीम सेनेने दलितांवर होत असलेल्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी 2017 साली दिल्लीतील जंतरमंतर येथे प्रचंड रॅली आयोजित केली तेव्हा इतरांना भीम सेनेची दखल घ्यावी लागली. बसपा समोरचे हे एक आव्हान. दुसरे म्हणजे भाजपाने अलिकडे शिताफीने बसपाच्या दलित मतांच्या हक्कांच्या पेटीवर धाड टाकली आहे. बसपाने जरी दलितांची एकी घडवून आणलेली आहे तरी बसपामध्ये दलितांतील जात व या जातीचे प्राबल्य आहे. म्हणूनच बिगरजात व दलित समाज बसपावर फारसा खुश नाही. भाजपाने या बिगर-जात व दलित समाजाला आकृष्ट केले. याचा फायदा भाजपाला 2014 च्या लोकसभा, 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा, 2019 च्या लोकसभा निवडणूका आणि 2022 च्या विधानसभा निवडणूकांत मोठया प्रमाणात झाला.
अशा प्रतिकुल स्थिती आकाश यांच्याकडे बसपाचे नेतृत्व जात आहे. त्यांच्यासमोर हिमालयाएवढी आव्हानं आहेत. आज देशाच्या राजकारणात दखल घ्यावा असा दलित समाजाचा पक्ष नाही. आजची भीम सेना उत्तर प्रदेशाच्या काही भागापुरती सीमित आहे. अशा स्थितीत बसपाचे पुनरूज्जीवन फार गरजेचे आहे. म्हणून आकाश यांना भरपुर शुभेच्छा!