नवी दिल्ली : जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी हिंदू देव मानववंशशास्त्रीयदृष्ट्या उच्च जातीतून येत नाहीत, असे वक्तव्य केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या बीआर आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्याख्यानमालेत बोलताना, “मानववंशशास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही. बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे, असा माझा अंदाज आहे. कारण ते एका स्मशानभूमीत सापासह बसले आहेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मानवशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत. मग आपण हा भेदभाव करतो. हे अत्यंत अमानवीय आहे.”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
”मनुस्मृतीने सर्व महिलांना शूद्र म्हणून वर्गीकृत केले आहे, ‘मनुस्मृती’ नुसार सर्व स्त्रीया शूद्र आहेत. त्यामुळे कोणतीही स्त्री ती ब्राह्मण किंवा इतर कोणत्या जातीची असल्याचा दावा करू शकत नाही”, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी राजस्थानमध्ये नुकत्याच एका नऊ वर्षांच्या दलित मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याच्या घटनेचा संदर्भही दिला.
”पिण्याच्या पाण्यााला हात लावला म्हणून एका नऊ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार अत्यंत अमानवीय होता. एक माणून एक दुसऱ्या माणसाशी असं कसं वागू शकतो? जर भारतीय समाजाला प्रगती करायची असेल तर जातींचे उच्चाटन करणे अत्यंत गरजेचे आहे.”, असेही त्या म्हणाल्या.