पुणे, दि. 15 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) 1 हजार 663 अपात्र उमेदवारांना निकालात फेरफार करून पात्र करण्यात आल्याची आणखी एक बाब उघड झाली आहे. आत्तापर्यंत दोन परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे.
जानेवारी 2020 मध्ये झालेल्या “टीईटी’ परीक्षेत 7 हजार 880 उमेदवारांना आर्थिक भानगडी करून निकालात “नापास’ असताना त्यांना “पास’ केल्याची बाब पुणे पोलिसांनी उघडकीस आणली होती. पोलिसांनी 2018च्या परीक्षेचाही तपास केला, त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. यानुसार या परीक्षेतही गैरप्रकार करून काही उमेदवारांनी स्वत:स “पात्र’ करून घेतले आहे. 779 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असताना देखील अंतिम निकालामध्ये संबंधित उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आले आहे. 884 उमेदवार हे अंतिम निकालात अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेकडून प्रमाणपत्र वितरीत झालेले नाहीत, त्यांनी बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रक मिळवले आहेत.
यामुळे या सर्व उमेदवारांचे “टीईटी’चे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून यापुढे त्यांना “टीईटी’ परीक्षेला बसण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. या घोटाळेबाज उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेकडून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी जारी केले आहेत.
युवाशाही संघटनेने यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही केले होते. 2013 पासून झालेल्या सर्वच परीक्षेच्या निकालाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही या संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.