-इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
-पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने 18 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.
पितृत्वाच्या रजेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. त्याने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन केले. त्यामुळे इशांत शर्माची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इशांत शर्माने फेब्रुवारी 2020 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते. त्याशिवाय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. 2018 नंतर हार्दिक पंड्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली होती. यांचे संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे. सिराजने तीन कसोटी सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. तर शार्दुल ठाकूरने एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत 7 बळी घेतले आहेत.