पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कर सहायक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा होऊन चार महिने उलटले. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अद्याप कौशल्य चाचणीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण असून, आयोगाने तातडीने प्रलंबित परीक्षेचा निकाल जाहीर करून कौशल्य चाचणीची तारीख घोषित करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यात कर सहायक ४६८ पदांसाठी आणि लिपिक पदाच्या ७ हजार ३४ अशा एकूण ७ हजार ५०२ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या भरतीची जाहिरात २० जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पूर्वपरीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी व मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी घेतली गेली. पूर्वपरीक्षा होऊन जवळजवळ १ वर्ष आणि मुख्य परीक्षा होऊन ४ महिने होत आले, तरीही अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. या निकालाच्या प्रतीक्षेत उमेदवार आहेत.
लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा केव्हा होणार, याबाबत कोणतेही संकेत नाहीत. आयोगाने वापरलेला यथावकाश शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसवणारा आहे. निकालास उशीर होत असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. लवकर निकाल आला नाही, तर प्रक्रिया पूर्ण होण्यास दीड ते दोन वर्ष लागेल, अशी भीती उमेदवारांतून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे म्हणाले, एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांत नैराश्य आले आहे. निकाल लांबणे, परीक्षा पुढे ढकलणे, पदभरतीच्या जाहिराती वेळेत प्रसिद्ध न करणे आदी कारणांमुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक, आर्थिक आणि सामाजिक कुचंबणा होते. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून आयोगाने कर सहायक आणि लिपिक पदांच्या परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करावा.