मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार अण्णा हजारे यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मला देण्यात आलेल्या सुरक्षेवर मोठा खर्च होतो. जनतेचा पैसा माझ्या सुरक्षेवर खर्च होत असल्याने मला वाईट वाटते. म्हणून ही सुरक्षा काढून टाकण्यात यावी. त्याऐवजी ज्यांना सुरक्षा कमी पडते अशा लोकांना ती देण्यात यावी, असे अण्णा यांनी पत्रात लिहिले आहे.
मला मरणाची भीती वाटत नाही. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात माझे अनेक साथी शहीद झाले. आता माझ्यात मरणाची भीती राहिलेली नाही. नैसर्गिक आजाराने मरण्यापेक्षा समाज, राज्य आणि देशाची सेवा करत मरण आले तर ते माझे भाग्य असेल, असे ते म्हणाले आहेत.
माझ्या बाबतीत एखाद्या वेळी नको अशी घटना घडली तरी मी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा काढण्यास लेखी स्वरुपात सांगितले आहे. त्यामुळे सरकारवर कोणतीही जबाबदारी येणार नाही, असंही अण्णा म्हणाले आहेत.